अभियंता वर्गाचे दुर्लक्ष : विजय भिके
प्रतिनिधी / म्हापसा
बस्ताडो येथे उत्तर गोव्याला पाणीपुरवाठा करणाऱया मुख्य पाईपलाईमधून दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे आढळून आले आहे. या पाईपला जोडून असलेले पाईप फुटून पाणी बाहेर जात आहे. सध्या पावसाचे पाणी शेतात भरत असून त्यात या पाण्याचा भर पडल्याने बस्तोडा भागात शेत जमिनीला तळीचे स्वरुप निर्माण झाले आहे.
14 जुलै 2019 रोजी अशाच प्रकारे पाईपलाईन फुटून याच ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेले होते. सध्या म्हापसा परिसरात काही ठिकाणी ऐन पावसाच्या दिवसात पाणीपुरवाठा होत नाही. त्यात पाईपमधून असे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे 100 मीटरच्या अंतरावर पीडब्ल्युडीचे काम सुरू आहे. मात्र या वाया जाणाऱया पाण्याकडे कुणीही लक्ष देत नाही ही आश्चर्याची बाब आहे.
निदान वाया जाणाऱया पाण्याकडे लक्ष द्या : भिके
सध्या सरकारला दररोजच्या सुविधा द्यायला पाहिजे त्या लोकांपर्यंत पोचता येत नाही. मे महिन्यात बार्देशात पाण्याचा दरवेळी त्रास होतो. जी पाईपलाईन दुरूस्त करायला पाहिजे ती होत नाही. अभियंता वर्ग झोपलेले आहेत. बस्तोडा येथे मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे. करासवाडा येथेही महिन्यापूर्वी असाच प्रकार घडला होता. याकडे लक्ष देणे खात्याची जबाबदारी आहे, असे मत उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके यांनी व्यक्त केले.
हमरस्त्यावर पाणी लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे सांगितल्यावर आपण घटनास्थळी भेट दिली. त्वरित अभियंता आर्सेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र उशिरापर्यंत याकडे कुणीही लक्ष दिले नाही. आता आमदार ग्लेन टिकलो यांनाही माहिती दिली आहे. या पूर्वीही असेच पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले होते. हे मुद्दाम कुणीही करतात काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे बस्तोडा भागात पाणीपुरवाठा होत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.