जिल्हय़ात शेतीची वाताहात लागण्याचे संकट
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आठवडाभरापूर्वी धो-धो बरसलेल्या पावसाने सद्या चांगलीच पाठ फिरवल्याने शेतकऱयांसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे. रत्नागिरीत शुक्रवारी देखील दिवसभरात पावसाचा एक टिपूसही पडलेला नाही. मात्र 27 ते 30 जूनपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
ऐन शेतीची लगबग सुरू असतानाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे लावणीलायक बनलेली भातशेती आता पावसाच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या आठवडाभरापासून ऐन पावसात उन्हाचा रखरखाट पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतजमिनी पावसाविना कोरडय़ा झाल्या आहेत. उकल, बेर केलेली नांगरणी आता पून्हा करण्याची वेळ शेतकऱयांवर येणार आहे. कारण तीव्र उन्हामुळे नांगरलेल्या शेतजमिनी कडक बनल्या आहेत.
सद्या केवळ पाणथळीची शेतलावणीची कामे शेतकऱयांनी हाती घेतलेली आहेत. तिथेही पावसाच्या दडीने पाण्याचा तुठवडा जाणवू लागला आहे. ज्याठिकाणी भात लावणी करण्यात आली त्या ती मळेशेतीही आता कोरडी पडू लागली आहे. पाण्याविना त्या जमिनीला भेगा पडल्याने लावलेले रोप सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांसमोर चिंतेचे ढग उभे राहिले आहेत.