आंबेवाडी मुख्य रस्त्याची कहाणी, नागरिकांच्या डोळय़ात आले पाणी
बेळगाव
आंबेवाडी येथील मुख्य रस्ता अर्धवट असल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. याबाबत कंत्राटदार सुस्त असून मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचे आगमन सुरू आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी यामधून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यात्रेपूर्वी हा रस्ता करणे गरजेचे होते. मात्र आता यात्रा संपली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. अर्धवट कामांमुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून कंत्राटदार मात्र सुस्त आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील मुख्य रस्ता वाहून गेला होता. त्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र आंबेवाडी ते कडोलीपर्यंतच्या रस्त्यासाठीही निधी मंजूर झाला असून त्यासाठी पावले उचण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. आंबेवाडी गावचा मुख्य रस्ता खोदाई करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गावातील कामगारवर्ग, शेतकरी, उद्योग खात्रीचे कामगार यासह इतर सर्व ग्रामस्थांना या खोदाई केलेल्या रस्त्यातून प्रवास करणे कठीण होत आहे. या गावावरून अनेक गावांतील नागरिक प्रवास करत असतात. मात्र खोदाई केलेल्या रस्त्यामुळे आता येथून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे कंत्राटदाराला जाग तरी कधी येणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि कंत्राटदाराची अवकृपा दिसून आली. आंबेवाडी गावची यात्रा दि. 2 एप्रिल रोजी मोठय़ा भक्तीभावाने झाली. मात्र गावातील रस्ता खोदाई करून ठेवण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे. हा रस्ता यात्रेपूर्वी करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने झोपेचे सोंग घेतल्यामुळे हा रस्ता पावसाळय़ापूर्वी तरी करावा, अशी मागणी होत आहे. आंबेवाडी ते कडोली हा मागील अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता आहे. मागील सात ते आठ वर्षांपूर्वी कडोली-आंबेवाडी रस्ता करण्यात आला होता. मात्र हा रस्ताही अर्धवट करण्यात आला.
आंबेवाडी गावातील रस्ता करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. तातडीने रस्ता करू, असे आश्वासन दिलेल्या कंत्राटदाराने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. रस्त्याची खोदाई करून रस्ता अर्धवट ठेवण्यात आला आहे. परिणामी खोदाई केलेल्या रस्त्यावर पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे खोदाई केलेल्या रस्त्यावर पाणी साचून आहे. यातून प्रवास करताना घसरुन पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या रस्त्यासाठी आता कोणी वाली आहे की नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
खोदाई केल्यामुळे चढ-उतार अशी अवस्था रस्त्याची बनली आहे. परिणामी हा रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गावातील मुख्य रस्ता खोदाई करून तो अर्धवट ठेवण्यात आल्याने वाहनचालकांची मोठी गोची होत आहे. रस्त्यावर चिखल असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंबेवाडी ते कडोलीपर्यंतच्या रस्त्यासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हा रस्ता होणार तरी कधी? याकडे साऱयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत..