कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ : कृष्णेत 1 लाख 62 हजार क्युसेकची आवक
वार्ताहर/ चिकोडी
शुक्रवारच्या तुलनेत महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रासह चिकोडी उपविभागात पावसाच्या प्रमाणात शनिवारी घट झाली आहे. पण पाणलोट क्षेत्र व धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला असल्याने उपविभागातील वेदगंगा, दूधगंगा, पंचगंगा व कृष्णाकाठावरील विविध गावांनी महापुराची धास्ती घेतली आहे. विविध ठिकाणी निवारा केंद्रे स्थापन करण्यात आली असून पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कृष्णाकाठाकडे शनिवारी धाव घेऊन पूरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच अधिकाऱयांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
शुक्रवारच्या तुलनेत कृष्णा नदीच्या पाण्याची आवक 24 हजार क्युसेक वाढल्याने अनेक शिवारात पाणी शिरले आहे. प्रशासनाद्वारे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. पुराचा संभाव्य धोका असलेल्या चिकोडी व निपाणी तालुक्यातील तब्बल 34 गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या गावांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने नियोजन कार्य सुरू केले असून काही गावामध्ये पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. कृष्णेत राजापूर धरणातून 1 लाख 28 हजार 875 क्युसेक तर दूधगंगेत 33 हजार 264 क्युसेक पाणी येत आहे.
सदलगा-बोरगाव पूल पाण्याखाली
चिकोडी तालुक्यातील वेदगंगा-दूधगंगा नदीवरील सदलगा-बोरगाव पूलही शनिवारी पाण्याखाली गेला असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. याआधीच कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर, दूधगंगा नदीवरील मलिकवाड-दत्तवाड व अंकली-बावनसौंदत्ती दरम्यानच्या ओढय़ावरील पूल पाण्याखाली गेल्याने सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
राजापूर जलाशयातून 1 लाख 28 हजार क्युसेकचा विसर्ग
राजापूर धरणातून तब्बल 1 लाख 28 हजार 875 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हिप्परगी जलाशयात येणाऱया 1 लाख 75 हजार क्युसेक पाण्याचा पूर्णपणे विसर्ग करण्यात येत आहे. तर आलमट्टी जलाशयात 1 लाख 80 हजार क्युसेक आवक होत असून या जलाशयातून 2 लाख 20 हजार क्युसेकचा विसर्ग ठेवण्यात आल्याने बॅकवॉटरच्या फटक्यावर नियंत्रण ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.