संकेश्वर :
ऐन सुगीच्या दिवसातही पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या पंधरा दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उत्पादित पिकांची कापणी व मळणीची कामे हाती घेण्यात आली होती. पण, शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने हवामानाचा कलच बदलून टाकला. काही वेळातच जोरदार पावसाने भागात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱयांनी पावसाचा जोर पाहून शिवारातून काढता पाय घेतला.
गतवर्षी महापुराने आहारधान्याचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे आहारधान्याचे उत्पादन घटल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या होत्या. यंदा पावसाळी हंगामाने शेतकऱयांना दिलासा दिला. हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला असताना याचकाळात हवामान पूर्णपणे गढूळ व दुषित झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतातील पिके घरी घेऊन जाण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सोयाबिन, ज्वारी, मका, शेंगा आदी प्रमुख पिकांची वेळेवर कापणी, मळणी झाली तरच शेतकऱयांच्या कष्टाला न्याय मिळणार आहे. पण, ऐन मोक्याच्या वेळीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱयांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. पावसामुळे शेतात पाणीपाणी झाले आहे. गळीत हंगामाचे दिवस तोंडावर आल्याने कारखानदार ऊस तोडणी-ओढणीचे नियोजन लावत आहेत. बीडच्या ऊस तोडकऱयांचे तांडे बोलवण्यासाठी प्रयत्न चालविण्यात येत आहेत. पण, निसर्गाची साथ मिळत नसल्याने नियोजनाचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पाऊस थांबला तरच शेतकऱयांच्या हाती पीक लागणार व कारखान्याची धुरांडी पेटणार. अन्यथा सुगी व गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.