कडक उन्हामुळे नागरिक बेहाल – पारा 27 अंशांवर
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात कोरोनाचे संकट घोंगावत असताना सध्या बाधित वाढ कमी झाल्याने सक्रीय रुग्ण संख्येचा आकडा खाली येताना दिसत असताना दुसरीकडे नागरिक डेंग्यूच्या साथीला तोंड देत आहेत. त्यात आता पावसाची रिमझिम थांबली असून गत दोन दिवसात कडक उन्हाचा तडाखा नागरिकांना जाणवत असल्याने नागरिक बेहाल आहेत.
यावर्षी जिल्हय़ात चांगला पाऊस झाल्याने सर्व धरणे भरली असून सातारा शहरानजिक असलेले कण्हेर धरण, उरमोड धरण व कास तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. गत दोन तीन दिवसात पावसाने दडी मारली असून पावसाची रिमझिम थांबली पण वातावरणात उष्णता वाढली आहे. त्यातच कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने नागरिकांना हा वातावरणातील बदल असहय़ होत आहे. सोमवारी सातारचा पारा किमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल 21 अंश सेल्सिअसवर होता.
उकाडा व उन्हाच्या झळांमुळे सर्व कार्यालयांसह घराघरात पंखे फिरु लागले असून थंडपेये घेण्याकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. शहरातील हॉटेल्समध्ये कोल्डिंक्स, आईस्क्रीमची मागणी वाढली असून शहरातील कोल्ड्रिंक हाऊसमध्ये नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. रात्रीच्या वेळी देखील हवेतील गारवा गायब झाल्याने उकाडा जाणवू लागला असून सध्या सातारकर कडक उन्हाच्या झळा सहन करत दैनंदिनी करत आहेत.