प्रतिनिधी / रत्नागिरी
हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार जिह्यातील किनारी भागात वेगवान वारे वाहत आहेत. अनेकांनी समुद्रात धोका पत्करण्यापेक्षा बंदरात राहणे पसंत केल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. पुढील तिन दिवस असेच वातावरण राहण्याच्या शक्यतेसह मच्छीमारांनाही सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
ढगांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने जिह्याला झोडपून काढले. लांजा, राजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने भातशेतीची दाणादाण उडाली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी देण्यात आले आहेत. वातावरण बदलाचा परिणाम मासेमारीवरही झाला आहे. वादळी वाऱयांमुळे अनेक नौका बंदरातच उभ्या आहेत.
चार दिवसांपुर्वी म्हाकूळ, दोडी, पापलेट अशी मासळी बारा वावात मिळत होती. त्यावर पाणी फेरले गेले आहे. वातावरण बिघडलेले असतानाही पर्ससिननेट, ट्रॉलिंगवाले मासेमारीसाठी रवाना होत आहेत. रविवारी सायंकाळी गेलेल्या नौका परतल्या. सोमवारी काही नौका रवाना झाल्या परंतु त्यांना ‘रिपोर्ट’ लागलेला नाही.
शनिवारपासून जिह्यात सगळीकडेच पाऊस सुरु आहे. लांजा तालुक्यात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. तासागणित पावसाचा जोर वाढत होता. रत्नागिरी तालुक्यात विविध भागात कापलेली भातशेती 48 तासाहून अधिक काळ पाण्यात राहीली आहे. राजापूर, संगमेश्वर, मंडणगड, दापोली तालुक्यातील मुसळधार पावसाने भातपिके मळ्यातच आडवी झाली आहेत. सोमवारी पाऊस थांबला असला तरीही ढगाळ वातावरण होते. पुन्हा पावसाच्या अंदाजाने मळ्यात कापून ठेवलेले भात कुजून जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. जिह्यात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती आहे.