ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
फेब्रुवारी ते जूनअखेरपर्यंत पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले नाही. परंतु अलीकडे घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. गेल्या 10 दिवसांत पाक सैन्याकडून दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे पुन्हा फेब्रुवारीपूर्वीची परिस्थिती तयार होताना दिसते. मात्र, प्रत्येक आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटले आहे.
लष्करप्रमुख नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱयावर आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते म्हणाले, वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा करार होईपर्यंत भारत आणि चीन दरम्यान सीमा वाद होत राहतील. गेल्या एक वर्षापासून चीनशी सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असून, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला वाद केवळ चर्चेच्या माध्यमातून सोडवता येईल, असेही नरवणे म्हणाले.
दरम्यान, आम्ही अफगाणिस्तानातील परिस्थितीवर नियमितपणे लक्ष ठेवून आहोत. अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या मदतीने तालिबान आंतरराष्ट्रीय सीमेवर कहर करत आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या अहवालांच्या आधारे तालिबान पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये मोठय़ा घटना घडवून ठेवू शकतो. हे लक्षात घेता भारतीय लष्करही प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास तयार आहे.