बारामुल्लाच्या रामपूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघन
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील रामपूर सेक्टरमध्ये शुक्रवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या या आगळीकीनंतर भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या कारवाईत पाकिस्तानचे काही सैनिक मारले गेल्याचे वृत्त असले तरीही त्याला पुष्टी मिळू शकलेली नाही.
तत्पूर्वी पाकिस्तानने राजौरी आणि पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार करत गुरुवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचे मोठे नुकसान घडवून आणले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. सातत्याने मानहानी पत्करूनही पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे.
शस्त्रसंधी उल्लंघनाचा उच्चांक
2019 मध्ये सर्वाधिक संख्येत शस्त्रसंधी उल्लंघनाचे प्रकार घडले होते. परंतु 2020 मध्ये पाकिस्तान त्याहूनही पुढे जाताना दिसून येत आहे. 2019 मध्ये एकूण 3,168 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन झाले होते. तर यंदा 6 महिने अद्याप पूर्ण झालेले नसतानाही पाकिस्तानकडून 2027 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानने मागील वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये 1,140 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. तर यंदा पहिल्या 5 महिन्यांमध्ये 1913 वेळा पाकिस्तानने आगळीक केली आहे.
घुसखोरी हाणून पाडली
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्याने होत असून त्यात त्याला अपयश येत आहे. याचबरोबर काश्मीर खोऱयातील दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून खात्मा केला जात आहे. याच कारणामुळे पाकिस्तान बिथरला आहे. यंदा आतापर्यंत 98 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आले आहे.