मागील वर्षी फेब्रुवारीमधील पाकपुरस्कृत पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची नांगी चांगलीच ठेचली होती. दहशतवाद पोसून भारताला वारंवार डिवचणाऱया पाकिस्तानला दहशत बसेल, असाच हा तडाखा होता. बालाकोट हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानची पुरती नामुष्की झाली होती. यातून ते काहीतरी धडा घेतील असे वाटले होते. पाकिस्तानच्या धडावर गोळीबार आणि बॉम्बहल्ला होऊनही त्याची वीतभर शेपूट अजूनही वळवळत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जैश ए मोहम्मद व हिज्बुल मुजाहिद्दीन या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेने आखलेली पुलवामासारख्या आत्मघाती हल्ल्याची पुनरावृत्ती करणारी योजना गुप्तचर विभागाने गुरुवारी उधळून लावली. त्यांच्या सतर्कतेमुळे फार मोठा अनर्थ टळला. याबद्दल गुप्तचर विभागासह लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलाचे कौतुकच करायला हवे. मागील वषी फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 40 सुरक्षा सैनिक हुतात्मा झाले होते. गेल्या 30 वर्षातील दहशतवादी हल्ल्यात एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा
प्रमाणात प्रथमच सुरक्षा सैनिक मारले गेले होते. भारताने याची गंभीर दखल घेत ‘ईट का जबाब पत्थरसे’ याप्रमाणे पाकिस्तानच्या घरात घुसून बॉम्बफेक करीत शेकडो अतिरेक्मयांना यमसदनी धाडले, त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. सध्याच्या वातावरणात काश्मीरमध्ये पुलवामा जिल्हय़ात दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न करणे हा निश्चितच करंटेपणा आहे. निर्दयी आणि पशुतुल्य कोटीतील वर्गच अशा काळात घृणास्पद कृत्य करू शकतो, हेच खरे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यात ठार मारण्याची ही योजना होती. राखीव दलाचा 20 वाहनांचा ताफा श्रीनगरहून निघणार होता. तब्बल 400 जवान जैश ए मोहम्मदच्या रडारवर होते. ताफ्याच्या मार्गावर वाटेत पुलवामा जिल्हय़ात आयईडी स्फोटकांनी भरलेली कार त्यांनी उभी केली होती. रिमोट कंट्रोलद्वारे स्फोट करून दहशतवादी हल्ला घडविण्याचा त्यांचा कट होता. गुप्तचर विभागाला याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे हा कट उघडकीस आला. बॉम्ब निकामी करणाऱया पथकाने स्फोटके निकामी केली. परिणामी फार मोठा अनर्थ टळला. तयातील दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून आदिल नावाचा अतिरेकी हा जैश आणि हिज्बुलसठी काम करतो. पाकिस्तानी दहशतवादी फौजी भाई त्याच्यासोबत कारमध्ये होता. गतवर्षी ऑगस्टमध्ये काश्मीरला घटनात्मक दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अलीकडच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. दहशतवाद्यांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये छुपे युद्ध छेडण्याची त्यांची जुनीच खोड आहे. लष्कर आणि पोलीस दलाने मागील काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये चांगलेच वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मोबाईल आणि इंटरनेट सुविधांवर जशा मर्यादा आल्या तशा दहशतवादी संघटनांच्या अंतर्गत समन्वयाअभावी नाडय़ा आवळल्या. काश्मीर मुद्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर अपयश आल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. म्हणूनच दहशतवादी संघटनांना हाताशी धरून काश्मीरमध्ये पुन्हा पुलवामा घडवून आणून अस्थिरता निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतील, असा अंदाज होताच. काश्मीरला भारतापासून वेगळे करून पाकिस्तानमध्ये सामील करण्याच्या कुटिल हेतूने जैश ए मोहम्मद ही संघटना आयएसआयच्या इशाऱयावर काम करते. काश्मीरला स्वतंत्र करून संपूर्ण देशात अतिरेकी कारवायांच्या माध्यमातून धार्मिक दहशतवाद पसरवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. जम्मू काश्मीर विधानसभेवरील हल्ला, संसद हल्ला व पठाणकोट, उरी, पुलवामा हल्ल्यामागे जैशचा हात उघड झाला आहे. आपण जणू दहशतवादाविरोधात आहोत, ही आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी जैशला सहकार्य करीत नसल्याचा दांभिकपणा पाकिस्तान नेहमीच करीत आला आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवायचा, त्यांना लष्करी प्रशिक्षण द्यायचे आणि भारत हा इस्लामविरोधी देश असल्याचे भडकावून त्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवायचे, ही कूटनीती पाकिस्तान वापरत आला आहे. सीमेवरील संबंध शांततापूर्ण, सलोख्याचे, बळकट करण्याची खोटी आश्वासने पाकिस्तान नेहमीच देत आला आहे. याचे भक्कम उदाहरण द्यायचे झाल्यास पाकिस्तानने गेल्या काही वर्षात हजारोवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू काश्मीरचे 370 वे कलम रद्द केल्यानंतर ऑगस्टपासून आतापर्यंत पाकिस्तानने सुमारे 1500 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषा व सीमेलगतच्या गावांना पाकिस्तान सैन्याकडून वारंवार लक्ष्य केले जात आहे. बेछूट गोळीबार व तोफगोळय़ांच्या भीतीने या भागातील कित्येक भारतीय नागरिकांनी स्थलांतर केले आहे. त्यांची शेती व शिक्षणाचे अतोनात नुकसान झाले आहे. संसद हल्ला, मुंबई बॉम्बस्फोट, पठाणकोट, उरी, पुलवामा हे आणखी कितीकाळ चालणार? ते छुपे युद्ध आहे. यामध्ये संपत्ती आणि विकासाचे अतोनात नुकसान होत असल्याने ते परवडणारेही नाही. सर्व बाजूनी गांजलेला पाकिस्तान या दहशतवादाला बळ देत आला आहे. दहशतवाद हे त्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. दहशतवादी तयार करण्याची फॅक्टरी पाकिस्तान चालवत आहे. गरजू युवकांना छुपा अर्थपुरवठा करून त्यांना दहशतवादी बनविले जात आहे. स्थानिक युवक त्याला बळी पडत आहेत. हे मागील पुलवामा हल्ल्यावेळीदेखील सिद्ध झाले होते. दारिद्रय़, बेरोजगारी, असुरक्षिततेची भावना, आर्थिक व विकासामधील विषमता यामध्ये दहशतवादाची मुळे रुजलेली असतात. स्थानिकांचे प्रश्न आणि अडचणी समजावून घेऊन दहशतवादाविरोधी दीर्घकालीन धोरणात्मक योजना आवश्यक आहे. जेणेकरून पुलवामाची पुनरावृत्ती टळेल.
Previous Articleलघुउद्योगांपुढील आव्हाने आणि उपाययोजना
Next Article आधारच्या आधारे काही मिनिटात पॅनकार्ड
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.