ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक आणि मच्छिमारांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शुक्रवारी भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडे पाकिस्तानात असलेले भारतीय कैदी आणि मच्छिमारांची यादी सुपूर्द केली आहे. पाकिस्ताननेही इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाला अशीच यादी सादर केली आहे. त्यामुळे लवकरच पाकच्या तुरुंगातील भारतीयांची सुटका होणार आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 2008 च्या करारानुसार दोन्ही देश दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी अशाच प्रकारच्या कैद्यांची आणि मच्छिमारांची देवाणघेवाण करतात. भारताने 282 पाकिस्तानी कैदी आणि 73 मच्छिमारांची यादी पाकिस्तानला दिली आहे. पाकिस्ताननेही आपल्या ताब्यातील 51 भारतीय नागरिक आणि 577 भारतीय मच्छिमारांची यादी भारताला दिली आहे.
याबरोबर भारताने भारतीय नागरिक आणि बेपत्ता संरक्षण कर्मचारी, पाकिस्तानात दाखल असलेल्या मच्छिमारांना त्यांच्या बोटींसह लवकरात लवकर सोडण्यास सांगितले आहे. या नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी झाली आहे.