ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताकडून तांत्रिक बिघाडामुळे सुटलेले क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानच्या हद्दीत 124 किलोमीटर आतमध्ये कोसळले होते. पाकिस्तानकडून संबंधित भागाच्या तपासणीसाठी पथक देखील पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेमध्ये निवेदन सादर केलं.
राजनाथ सिंह यांनी निवेदनात म्हटले आहे की, 9 मार्च रोजी नियमित देखभालीवेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे चुकून क्षेपणास्त्र सुटले. ते पाक हद्दीत 124 किमी आतमध्ये कोसळले. हा मुद्दाम केलेला हल्ला नव्हता. भारतीय क्षेपणास्त्र ही सुरक्षित असून त्यांची विश्वासार्हता उच्च प्रतीची आहे. पण पाकिस्तानला हे मान्य नाही. पाकिस्तानकडून संबंधित भागाच्या तपासणीसाठी पथक देखील पाठवण्यात आली आहेत. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. ऑपरेशन्स, मेंटेनन्स आणि इंस्ट्रक्शनसाठीच्या एसओपीचाही आढावा घेतला जात आहे. आपण आपल्या शस्त्र प्रणालींच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतो. यासंदर्भात काही त्रुटी आढळून आल्यास तात्काळ दूर करण्यात येतील, असेही सिंह यांनी सांगितले.