नावही बदलले : शेजारी देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायाचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याचे प्रकार सुरूच आहेत. हिंदू, शीख आणि ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर घडवून आणत त्यांचा बळजबरीने मुस्लिमांशी विवाह लावून दिला जात आहे. सिंध प्रांतात शिक्षिका असलेल्या एकता कुमारी यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्यात आले असून याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने सोयीस्करपणे मौन बाळगले आहे. पाकिस्तानात दरवर्षी सुमारे 1000 अल्पसंख्याक मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे.
पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्या राहत ऑस्टिन यांनी ट्विट करत एकता यांचे छायाचित्र तसेच धर्मांतराचे प्रमाणपत्र प्रसारित केले आहे. एका प्राथमिक शाळेच्या हिंदू शिक्षिका एकता कुमारी यांचे सिंधच्या घोटकी येथे मियां मिट्ठू याच्या माध्यमातून बळजबरीने धर्मांतर करण्यात आले आहे. एकता यांचे नाव आता आयेशा ठेवण्यात आल्याचे ऑस्टिन यांनी म्हटले आहे.
वॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटीने केलेला ट्विटही प्रसारित होत आहे. पाकमध्ये बळजबरीने धर्मांतर घडविणे आता सर्वसामान्य बाब ठरली आहे. देशाच्या ध्वजातून पांढरा रंग पूर्णपणे नाहीसा होण्याचा दिवस निश्चितच येईल, असे ट्विटमध्ये गेले आहे. पाकिस्तानच्या ध्वजातील पांढरा रंग अल्पसंख्याकांचे प्रतीक आहे.
मियां मिट्ठू याने घोटुकी क्षेत्रात अनेक अल्पवयीन मुलींचे धर्मांतर घडवून आणले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने कविता कुमारी हिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. 2019 मध्ये मिट्ठूने महक केसवानी आणि दोन अल्पवयीन बहिणी रविना तसेच रीना यांचे अपहरण करत त्यांचे धर्मांतर घडवून आणले होते. मियांच्या विरोधात बळजबरीने धर्मांतर घडविण्याचे आतापर्यंत 117 गुन्हे नोंद आहेत. परंतु त्याच्या विरोधात कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.