ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता पाकिस्तानला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. भारताच्या नकारामुळे पाकिस्तानमध्ये नियोजित असलेली आशिया कप 2020 ही स्पर्धा पाकिस्तानात खेळली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते, पण भारताच्या नकारानंतर आता स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात येणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती.
भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यामुळे आता ही स्पर्धा बांगलादेश, श्रीलंका अथवा दुबईमध्ये आयोजित करण्यातचा विचार सुरू आहे.
दरम्यान, आशिया कप स्पर्धा टी 20 प्रकारात खेळली जाणार आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून आशिया कप स्पर्धा टी 20 पद्धतीने खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टी 20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.