पीटीआयच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या
वृत्तसंस्था/ मुजफ्फराबाद
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये रविवारी कथितरित्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. यादरम्यान एका मतदान केंद्रावर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या (पीटीआय) राजकीय पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे.
पाकव्याप्त काश्मीरच्या 33 मतदारसंघांमध्ये 587 उमेदवार उभे आहेत. तर पाकिस्तानात स्थायिक झालेल्या शरणार्थींच्या 12 मतदारसंघांमधून 121 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदानादरम्यान शांतता राखण्यासाठी मोठय़ा संख्येत सैनिकांना तैनात करण्यात आले होते. 2 हजारांहून अधिक मतदान केंद्रांना संवेदनशील किवा अत्याधिक संवेदनशील घोषित करण्यात आले होते.
बॅलेट चोर जिंकू नये
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. इम्रान खान सरकारचा उल्लेख करत शरीफ यांनी बॅलेट चोर (मतपत्रिका चोरणारा) जिंकू नये हे मतदारांच्याच हातात असल्याचे म्हटले आहे. जेव्हा एक मत चोरीला जाते, तेव्हा त्यातून लोकांच्या मुलांचे शुल्क, खर्च आणि रोजगार हिरावला जातो. लोकांच्या मतांचे रक्षण करण्याचे आवाहन करत आहे. पेटी, साखर, पीठ, औषध चोराला रोखावे लागेल असे शरीफ यांनी म्हटले होते.
इम्रान यांची प्रलाभने
तर इम्रान खान यांनी मतदारांना मोठमोठी प्रलोभने दाखविली होती. काश्मीरच्या लोकांसाठी जनमत चाचणीची अपेक्षा आहे, जेणेकरून ते पाकिस्तानात सामील होऊ इच्छितात का स्वतंत्र देश इच्छितात हे जाणून घेतले जावे. 1948 मधील संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या दोन प्रस्तावांनुसार काश्मीरच्या लोकांना स्वतःचे भविष्य निश्चित करण्याचा अधिकार मिळतो असे इम्रान यांनी म्हटले होते. इम्रान यांना या विधानामुळे पाकिस्तानातूनच टीकेला सामोरे जावे लागत आहे.