सीपीइसी नष्ट करण्याचा भारताचा कट : दहशतवादी हल्ले घडविल्याचा बिनबुडाचा आरोप
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे हादरलेल्या पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी आणि पाक सैन्याच्या प्रवक्त्याने भारतावर बलुचिस्तानात दहशतवाद फैलावण्याचा हास्यास्पद आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशनात भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला नष्ट करण्यासाठी 80 अब्ज रुपये दिले असून 700 दहशतवादी तयार केल्याचा बिनबुडाचा आरोप कुरैशी यांनी केला आहे.
पाकिस्तानच्या विदेशमंत्र्यांनी कथित भारतीय दहशतवादावर शनिवारी डोजियर सादर केले आहे. भारताने 700 लोकांना मिलिशिया (दहशतवादी) केले असून ते बलुचिस्तानात सीपीईसीला लक्ष्य करत राहतील. भारताने गिलगिट-बाल्टिस्तानातील निवडणुकीपूर्वी तेथे राष्ट्रवादाला बळ देण्याचा प्रयत्न केला होता, असा कांगावाही कुरैशी यांनी केला आहे.
रॉचा केला उल्लेख
रॉने सीपीइसीला लक्ष्य करण्यासाठी एक विशेष शाखा तयार केली आहे. भारत स्वतःच्या भूमीचा वापर पाकिस्तानात दहशतवाद फैलावण्यासाठी करत आहे. याचबरोबर भारत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापरही पाकिस्तानवर हल्ल्यासाठी करत आहे. भारत संयुक्त राष्ट्रसंघ, व्हिएन्ना करारासह तीन आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानला एफएटीएफमध्ये काळय़ा यादीत सामील करण्यासाठी भारत दबाव आणत असल्याचे कुरैशी यांनी म्हटले आहे.
अधिकाऱयाचे घेतले नाव
पाकिस्तानातील दहशतवादी घटनांमागे भारताचा हात आहे. बीएलए, बीआरए आणि तहरीक-ए-तालिबानला भारत मदत करत आहे. अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाचे अधिकारी राजेश यांनी पाकिस्तानच्या लाहोर, कराची यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये हल्ल्याची योजना आखल्याचा बिनबुडाचा दावा पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने केला आहे.
पाकिस्तानी आयएसआयएस
भारताने आयएसआयएस या दहशतवादी संघटनेची पाकिस्तानी शाखा निर्माण करविली आहे. याचे नाव ‘दायश पाकिस्तान’ ठेवण्यात आले आहे. अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास पाकिस्तानात दहशतवाद फैलावण्याचे केंद्र ठरले आहे. अफगाणिस्तानात भारतीय राजदूताने तहरीक-ए-तालिबानला मदत करण्यासाठी बैठक घेतली होती. रॉ अफगाणिस्तानच्या मदतीने पाकिस्तानात तहरीक-ए-तालिबानला पैसा पाठवत असल्याचा कांगावा पाकने केला आहे.