भारतातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानल्या गेलेल्या मुंबईवरील हल्ल्याला 12 वर्षांचा कालावधी गुरूवारी लोटला आहे. पाकिस्तानच्या 10 दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे भारतात घुसून तो केला. त्यात महाराष्ट्र दहशतवादविरोधी दलाच्या 3 वरिष्ठ अधिकाऱयांसह जवळपास 140 जणांचा बळी गेला. 9 दहशतवादीही मारले गेले आणि अजमल कसाब या जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याला नंतर फासावर लटकविण्यात आले. मुंबई हल्ल्याचे कारस्थान पाकिस्तानात रचले गेले आणि जेव्हा तो होत होता तेव्हा दहशतवाद्यांना पाकिस्तानमधूनच सूचना मिळत होत्या, ही बाबही सिद्ध झाली. या हल्ल्याच्या विदारक स्मृती आजही सर्व भारतीयांच्या मनात ठसठसत आहेत. पाकिस्तानाच्या लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद हा या कारस्थानाचा प्रमुख सूत्रधार होता. त्याच्यासह पाकिस्तानचे 19 दहशतवादी त्यात सहभागी होते. भारताने या दहशतवाद्यांची सूची पाकला सोपविली होती व कठोर कारवाईची मागणी अनेकदा केली होती. या हल्ल्यात मारले गेलेल्यांमध्ये केवळ निरपराध भारतीयांचा समावेश होता असे नव्हे, तर मुंबईतील कबाड हाऊस या ज्यू धर्मियांच्या धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आला होता. तसेच ज्या ताज हॉटेलवर मुख्य हल्ला झाला तेथे काही अमेरिकन नागरिकांचाही बळी गेला. त्यामुळे या कारस्थानाची आंतरराष्ट्रीय दखल घेतली गेली. तसेच इस्लामी दहशतवादाचे भीषण स्वरूप जगासमोर आले. पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध असावेत अशी इच्छा असणारे आणि त्यासाठी मवाळ भूमिका घेऊन पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करणारे सरकार त्यावेळी भारतात होते. तरीही पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे मन द्रवले नव्हते. त्यांनी त्यांना हवे ते शेवटी करून दाखविलेच. त्यावेळच्या भारत सरकारने नंतरही पाकिस्तानसमोर हे प्रकरण सामोपचारी मार्गानेच उपस्थित केले. पाकला भक्कम पुराव्यांची कागदपत्रे (डोसियर) किमान दोन वेळा सुपूर्द करण्यात आली. अपेक्षा ही होती की पाक काही हालचाल करेल आणि या कारस्थानाचे जे सूत्रधार त्या देशात सुखनैव संचार करीत आहेत, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रामाणिकपणे कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची व्यवस्था करेल. तथापि, आज 12 वर्षांनंतरही ही अपेक्षा 1 टक्काही पूर्ण झालेली नाही. कारस्थानाचा प्रमुख सूत्रधार हाफिझ सईद याला तेथील न्यायालयाने एका प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र ताज्या वृत्तानुसार मुंबई हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण होत असतानाच त्याची पुन्हा गुपचुप सुटका करण्यात आली असून त्याला त्याच्या घरीच संरक्षणात ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की पाकिस्तान साऱया जगाच्या डोळय़ात धूळफेक करीत आहे. अर्थात तो देश यापेक्षा वेगळे काही करेल असे वाटत नव्हतेच. धार्मिक दहशतवाद हे ज्या देशाचे ‘परराष्ट्र धोरण’च आहे, तो देश कसा वागणार हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मुंबई हल्ल्याच्या पूर्वीपासूनच भारताच्या कुरापती सातत्याने काढत राहणे हा पाकिस्तानचा आवडता छंद होता आणि आहे. सीमेवर कायम अशांतता राहील, काश्मीर व पर्यायाने भारतालाही नेहमी भीतीच्या छायेत वावरावे लागेल आणि त्यायोगे काश्मीरचा घास घेण्याची आपली विकृत महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल, अशा भ्रमात पाकिस्तान आहे. वास्तविक दहशतवादाचा आधार घेऊन तो देश भारताला अपशकुन करीत असला तरी या नादात त्याने स्वतःचे नाकही कापून घेतले आहे. तथापि, तेथील दहशतवादी संघटनांना तेथील लष्कराचे पाठबळ आहे आणि आतापर्यंतच्या पाक सरकारांना लष्करासमोर नाक घासण्याशिवाय काही करता आलेले नाही. सध्याचे इम्रानखान सरकार तर लष्कराच्याच कृपेने निवडून आलेले असल्याने त्याचाच वरदहस्त लाभलेल्या दहशतवादी संघटनानांना आवर घालण्याची त्याची इच्छा आणि क्षमताही नाही. तेव्हा पाकिस्तानला दणका देण्याची कृती भारत सरकारलाच करावी लागणार. तशी ती सर्जिकल स्ट्राईक आणि वायुहल्ला करून दोनदा करण्यात आली आहेच. पण त्यामुळे तो देश शहाणा झालेला नाही व होण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे निर्णायक तडाखा देण्याचे काम भारताला कधी ना कधी करावे लागणार हे उघड आहे. पाणी डोक्यावरून वाहण्याच्या आत ते करणे आवश्यक आहे. तीच मुंबई हल्ला तसेच देशातील अन्य पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांमधील बळींना खरी श्रद्धांजली असेल. त्याचप्रमाणे देशाच्या भूसीमा, वायुसीमा आणि सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे हे सरकारचे कर्तव्य आहे, जेणेकरून मुंबई हल्ल्यासारख्या घटना कधीही घडणार नाहीत. या हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असला तरी त्यावेळच्या भारत सरकारने सागरी सीमांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्षही तितकेच उत्तरदायी आहे. हा हल्ला होऊन बारा वर्षे झाली तरी आजही सागरी सीमा म्हणाव्या तशा सुरक्षित नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. ते खरे असेल तर 12 वर्षांमध्ये आपण काहीच शिकलो नाही असे म्हणावे लागते. पाकिस्तान कधीही दहशतवादी संघटनांना अंतर देणार नाही. तो देश कारवाई केल्याचे नाटक करीत राहणार आणि भारताच्या व जगाच्या डोळय़ात धूळफेक करीत राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे भारतालाच आक्रमक भूमिका घेऊन स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करावी लागणार आहे. चर्चेच्या माध्यमातून हा दहशतवादाचा प्रश्न सुटत नाही, हे एव्हाना अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे दंड आणि भेद हे दोनच उपाय उरतात. त्यासाठी भक्कम तयारी करावी लागणार हे उघड आहे, पण ती केल्याशिवाय पर्याय नाही. सध्याचे केंद सरकार तसा कल दाखवित आहे. तसेच संरक्षणाची तयारीही जोरदार सुरू असल्याचे दिसून येते. आधुनिक शस्त्रसामग्रीसमवेत सीमांच्या सुरक्षा आणि प्रतिआक्रमण यांच्यासाठी अत्याधुनिक संपर्क व दूरसंचार यंत्रणाही आवश्यक असून ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांची गती वाढवून, पाकिस्तानला नामोहरम केल्याशिवाय भारताला शांतता लाभणार नाही. भारत सरकार ही अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा आहे.
Previous Articleविनाशकाले विपरीत बुद्धि:।
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.