वृत्तसंस्था / इस्लामाबाद :
बेताल तसेच निरर्थक वक्तव्यांसाठी चर्चेत राहणारे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी पुन्हा एकदा भारतासोबत आण्विक युद्धाचा राग आळवला आहे. पाकिस्तानने स्वतःचे अस्त्र तयार ठेवले असून भारताने हल्ला केल्यास पारंपरिक युद्ध होणार नाही, तर थेट आण्विक हल्ला होणार आहे. आण्विक हल्ल्यात आसामपर्यंतचा भाग लक्ष्य केला जाणार असल्याची वल्गना अहमद यांनी केली आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनच्या विरोधात चीन उभा ठाकला आहे. चीनन नवे मित्र नेपाळ, श्रीलंका, इराण आणि रशियासोबत नवा गट निर्माण करत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने चीनसोबत उभे रहावे अशी भूमिका रशीद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली आहे.
…तर थेट आण्विक हल्ला
हे रक्तरंजित आणि अखेरचे युद्ध असेल आणि ते आण्विक राहणार आहे. आमचे अस्त्र छोटे, परिपूर्ण आणि लक्ष्यावर नजर ठेवून आहे. ते आसामपर्यंतचा भाग लक्ष्य करू शकते. पाकिस्तानकडे पारंपरिक युद्धाचा पर्याय नसल्याची बेताल बडबड रशीद यांनी केली आहे.
250 ग्रॅमचे अणुबॉम्ब
पाकिस्तानकडे 125 आणि 250 ग्रॅमचेही अणुबॉम्ब असून ते कुठल्याही विशेष लक्ष्यावर मारा करू शकतात असे म्हणत त्यांनी काही आठवडय़ांपूर्वी भारताला धमकाविले होते. त्यांच्या या विधानाची समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात खिल्ली उडविण्यात आली होती.
लागला होता वीजेचा धक्का
रशीद तसेही बेताल तसेच निरर्थक विधानांसाठी चर्चेत असतात. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतेवेळी रशीद यांना माईकमधून विजेचा धक्का बसला होता. विजेचा धक्का लागण्यामागे भारताचा हात असल्याचा अजब दावाही त्यांनी केला होता. या प्रसंगामुळे रशीद हे भारतात थट्टेचा विषय ठरले होते.