बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या दौऱयाची तयारी – भारताचे टेन्शन वाढणार
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांचे पाकिस्तान प्रेम वाढत चालले आहे. शेख हसीना लवकरच पाकिस्तानचा दौरा करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. या हायप्रोफाइल दौऱयावरून पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सरकारांनी तयारीही सुरू केली आहे. तर एक दिवसापूर्वीच शेख हसीना यांनी बांगलादेशातील पाकिस्तानचे राजदूत इम्रान अहमद सिद्दीकी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान हसीना यांनी पाकिस्तानसोबत मजबूत व्यापारी संबंध आणि आर्थिक सहकार्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला होता.
पाकिस्तानी राजदूताने मागील 11 महिन्यांमध्ये दुसऱयांदा हसीना यांची भेट घेतली आहे. मागील एक दशकापासून पाकिस्तान आणि बांगलादेशचे संबंध अत्यंत बिघडलेले आहेत. पण आता दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये पुन्हा सुधारणा दिसून येतेय. मागील वर्षी पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी हसीना यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.
पाकचे निमंत्रण स्वीकारले
शेख हसीना यांनी अलिकडेच इम्रान खान यांच्या निमंत्रणाला लेखी स्वरुपात स्वीकारले आहे. यामुळे दोन्ही देश या बहुप्रतीत्रित दौऱयाच्या तयारीला लागले आहेत. पण अद्याप हसीना यांच्या पाक दौऱयाच्या तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही. मागील 13 वर्षांपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील विदेश सचिव स्तरीय चर्चा स्थगित आहे.
संबंधात तणाव का होता?
2009 साली शेख हसीना दुसऱयांदा पंतप्रधान होताच त्यांनी 1971 च्या युद्धगुन्हय़ांशी संबधित खटले पुन्हा सुरू केले होते. या खटल्यांमध्ये बांगलादेश मुक्तिसंग्रामावेळी पाकिस्तानला साथ देणाऱया अनेकांना शिक्षा सुनावण्यात आली. 1971 च्या नरसंहारासाठी पाकिस्तानने माफी मागावी अशी मागणी बांगलादेश दीर्घकाळापासून करत आहे.
चीनमुळे पाकशी जवळीक
बांगलादेश आणि पाकिस्तान ऐतिहासिक दृष्टय़ा परस्परांचे कट्टर शत्रू राहिले आहेत. पण चीमुळे दोन्ही देश पुन्हा एकदा जवळ येत आहेत. चीन दोन्ही देशांना मोठय़ा प्रमाणात कर्ज देतोय. अशा स्थितीत चीन पाकिस्तान आणि बांगलादेशला एकत्र आणून भारतासाठी अडचणी निर्माण करू इच्छितो. चीनने बांगलादेशात 26 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर 38 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे. चीनने बांगलादेशच्या 97 टक्के उत्पादनांना टॅक्स फ्री घोषित केले आहे.
भारताकरता नवी डोकेदुखी
बांगलादेश आणि पाकिस्तान चीनच्या छत्रछायेत परस्परांचे मित्र झाल्यास हे भारतासाठी नवी डोकेदुखी निर्माण करणारे ठरणार आहे. दोन्ही देशांवर चीनचा मोठा प्रभाव आहे. धर्म आणि पैशांद्वारे बांगलादेश अन् पाकिस्तानची मैत्री निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. श्रीलंका यापूर्वीच चीनचा आर्थिक गुलाम ठरला आहे. म्यानमारच्या सैन्य राजवटीवर चीनचा वरदहस्त आहे. भूतानसोबतचा सीमा वाद सोडविण्यासाठी चीनने अलिकडेच करार केला आहे. अशा स्थितीत भारताला चहुबाजूने घेण्याचा प्रयत्न चीनने चालविला आहे.