ऑनलाईन टीम / मुंबई :
पाकिस्तानच्या कराचीमध्ये आलेले धुळीचे वादळ आता गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहचले आहे. या धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरातील दृश्यमानता कमी झाली आहे. तसेच हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने पाऊस पडला आहे.
धुळीच्या वादळाने मुंबई-पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफरने केली आहे. धूळयुक्त हवेचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असून सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. त्यामुळेच वातावरणात सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे.