भारताची ओआयसीला ताकीद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने इस्लामिक सहकार्य संघटनेला (ओआयसी) चांगलेच सुनावले आहे. पुढील आठवडय़ात ओआयसीची बैठक पाकिस्तानात होणार आहे. या बैठकीत हुर्रियत कॉन्फरन्सच्या अध्यक्षाला बोलावण्यात आले आहे. अशाप्रकारच्या कारवायांना आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो असे भारत सरकारने म्हटले आहे.
भारतविरोधी कारवायांमध्ये सामील राहणाऱयांना ओआयसी बळ पुरविणार नाही अशी अपेक्षा करतो. ओआयसीने विकास संबंधी महत्त्वपूर्ण घडामोडींवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी स्वतःच्या एका सदस्याच्या राजकीय अजेंडय़ानुसार काम करणे दुर्दैवी असल्याचे भारताने म्हटले आहे.
ओआयसी दहशतवाद आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्यांना प्रोत्साहित करणार नसल्याची भारत अपेक्षा करतो. देशाची एकता नष्ट करणे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणाऱया कारवायांना भारत अत्यंत गांभीर्याने घेतो. भारताच्या अंतर्गत विषयांवर स्वतःच्या व्यासपीठाचा लाभ उचलण्याची अनुमती न देण्याचे आवाहन आम्ही ओआयसीला वारंवार केले असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नमूद केले आहे.
इस्लामाबादमध्ये 22 आणि 23 मार्च रोजी संघटनेच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सच्या अध्यक्षाला आमंत्रित करण्यात आले आहे.