सिंध प्रांत हा पाकिस्तानातील 4 प्रांतांपैकी एक महत्त्वपूर्ण प्रांत आहे. पाकिस्तानच्या दक्षिण भागात वसलेला हा प्रांत पश्चिमेस बलुचीस्थान, पूर्वेस गुजरात, व राजस्थान, दक्षिणेस अरबी समुद्र आणि उत्तरेस पंजाब अशा सीमा प्रदेशांनी वेढलेला आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत दुसऱया क्रमांकावर असलेल्या या प्रांतांची कराची ही राजधानी पाक अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. सिंध प्रांताची संस्कृती पाकिस्तानच्या इतर प्रांतांपेक्षा काहीशी वेगळी असून या संस्कृतीवर सुफी विचारांचा मोठा पगडा आहे. पाकिस्तानातील सर्वाधिक हिंदू याच प्रांतात वास्तव्यास आहेत. या प्रांतातून सिंधू नदी वहात असल्याने त्यावरूनच सिंध हे नाव पडले आहे. जगप्रसिद्ध सिंधू संस्कृतीचा वारसाही या प्रांतास लाभला आहे. हा पाकिस्तानातील सिंध प्रांत बुधवारी घडलेल्या घटनेमुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. प्रांतांच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस हुद्यावरील पोलीस प्रमुखास अपमानास्पद व त्रासदायक वागणूक सत्ताधारी तहरिके इन्साफ पक्षाकडून मिळाल्यामुळे प्रांतातील डझनभर वरि÷ पोलीस अधिकारी निषेधार्थ रजेवर गेले आहेत. या अकस्मात उद्भवलेल्या पेचप्रसंगी सध्या पाकिस्तानचे राजकीय वातावरण जे आधीच गढूळ झाले होते ते अधिकच ढवळून निघाले आहे. ही घटना म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांच्या नेतृत्वाखालील तेहरिके इन्साफ पक्षाने चालविलेल्या राजकीय सूडचक्राचा भाग असल्याचे म्हणत या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी पक्षास धारेवर धरले आहे. आपल्या पंतप्रधानपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात सध्या इम्रानखान पहिल्यांदाच एका मोठय़ा राजकीय वादळास तोंड देत आहेत. पाकिस्तानातील जवळपास 11 विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इम्रानखान यांच्या सत्तेविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. या अकरा विरोधी पक्षानी सत्ताधाऱयांविरुद्ध देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अलीकडच्या काळात दोन मोठय़ा सभा एकत्रितपणे आयोजित केल्या. ज्यांना जनतेतून मोठा प्रतिसादही लाभला. या सभातून जी भाषणे झाली त्यातून तेहरिके इन्साफ पक्षाचा गैरकारभार, अन्नधान्य टंचाई, महागाई, गॅस दरवाढ, कायदा व सुव्यवस्थेचा बट्टय़ाबोळ या विषयांवर भर देण्यात आला. पाकिस्तानी लष्कराचे बाहुले बनून दडपशाही करणाऱया सत्ताधाऱयांचा धिक्कार करण्यात आला आणि अपयशी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. विरोधकांच्या या एकत्रित मोहिमेला मिळणारा लोकप्रतिसाद पाहून हळूहळू तेहरिके इन्साफच्या पायाखालील वाळू सरकत गेली आणि यानंतर दमन तंत्राचा अनिर्बंध वापर खास पाकिस्तानी परंपरेनुसार सुरू झाला. सिंध प्रांत या घटनाक्रमाचे केंद्रबिंदू ठरले. कारण दुसरी मोठी सभा या प्रांतातील कराची शहरात घेण्यात आली होती. पाकिस्तानातील संघराज्यीय पद्धतीप्रमाणे सिंध प्रांतात सध्या तेहरिके इस्लामच्या विरोधात असलेल्या पाकिस्तान पिपल्स पार्टीचे सरकार आहे. गेल्या 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या कराचीतील सभेनंतर केंद्र सरकारच्या रेंजर्सनी मध्यरात्री हॉटेलवर छापा टाकून मरयम नवाझ (नवाझ शरीफ यांची कन्या) यांच्या नवऱयास अटक केली. मरयम यांचा नवरा कॅप्टन महम्मद सफदर याला जिन्नांच्या स्मारकाजवळ सरकारविरोधी घोषणा दिल्यामुळे अटक केली. यानंतर सिंध प्रांताच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (अर्थात पोलीस प्रमुखास) कॅप्टन महम्मद सफदर व इतर नेत्यांवर कारवाई करण्यात कुचराई केल्याच्या आरोपावरून अपहरण करून पाकिस्तानी रेंजर्सच्या कार्यालयात चौकशीसाठी डांबण्यात आले. या कृत्याच्या निषेधार्थ सिंध प्रांतातील वरि÷ पोलीस अधिकारी रजेवर गेले. अशारीतीने पंतप्रधान इम्रानखानच्या तेहरिके इन्साफ या सत्ताधारी पक्षाच्या अधिकाराखालील पाकिस्तान रेंजर्स हे सुरक्षा दल आणि सिंध प्रांतातील विरोधी पक्षाच्या अखत्यारीतील पोलीस दल असा संघर्ष सध्या शिगेस पोहचला आहे. या दडपशाही विरोधात मुस्लीम लीगच्या मरयम नवाझ, पाकिस्तान पिपल्स पार्टीचे बिलावल भुट्टो, बलुचिस्तानचे राष्ट्रवादी नेते व इतर अन्य छोटय़ा मोठय़ा विरोधी पक्ष नेत्यांनी इम्रान सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
पाकमधील राजकीय परंपरेप्रमाणे विरोध मोडून काढण्यासाठी विरोधकांना तुरुंगात पाठवणे हा मार्ग पंतप्रधान इम्रान खाननी अवलंबिला आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे सह चेअरमन आणि माजी पंतप्रधान असिफ अली झरदारी सध्या पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. मुस्लीम लीगचे नेते व माजी पंतप्रधान नवाझ शरिफांवर खटले आहेत. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटीश सरकारकडे इम्रान खान पाठपुरावा करीत आहे. याशिवाय परवाच्या पाकिस्तान डेमॉपेटिक मुव्हमेंट या कार्यक्रमाखाली एकत्र आलेल्या 11 विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही खटले भरून त्यांना गजाआड करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या साऱया पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानी सरकार जे तेहरिके इन्साफ पक्षाच्या नेतृत्वाखाली दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आणण्यास आतापर्यंत तरी अयशस्वी झाले आहे. पाकिस्तानी डेमॉपेटिक मुव्हमेंटच्या नावाने एकत्रित आलेले विरोधी पक्ष ज्यांचे मुख्य लक्ष्य इम्रानखानचे सरकार खाली खेचण्याचे आहे. पाकिस्तानी लष्कर ज्याचा इम्रानखान सरकारला पाठिंबा आहे. पाकिस्तानी जनता जी शासनकर्त्यांना कंटाळली आहे आणि चांगल्या पर्यायाच्या प्रतीक्षेत आहे हे सारे महत्त्वपूर्ण घटक कोणती निर्णायक भूमिका बजावतात त्यावर पाकिस्तानचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. पाकिस्तानचा एकूण राजकीय इतिहास पाहिल्यास पाकिस्तानचे संस्थापक बॅ. जिना यांच्या स्वप्नातील स्थिर लोकशाही सरकार या देशात दीर्घकाळ कधीच अवतरलेले नाही. दीर्घकाळ लष्करी राजवट आणि लष्कराचे राजकीय वर्चस्व व हस्तक्षेप यामुळे या देशात लोकशाही पूर्णत: रुजलेली नाही. आजही लष्कराचा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप, मतदानात अफरातफर आणि लष्कराच्या मर्जीवर अवलंबून असलेले बाहुले सरकार ही तेथील परिस्थिती आहे. ही परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी भारताविरुद्ध कुरापती काढून आपले महत्त्व वाढविणे, दहशतवाद्यांना पोसणे, अफगाणिस्तान, बांगलादेश या शेजारील देशातील बंडखोर धार्मिक कट्टरतावाद्यांना मदत करणे या साऱया उचापती पाकिस्तानी लष्कर करत असते. या अशा विचित्र सत्तासंघर्षाच्या कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानची आर्थिक व सामाजिक स्थिती सध्या इतकी ढासळली आहे की हा देश चीनला जवळपास गहाणवट पडल्यासारखाच आहे. या तुलनेत पाकिस्तानातून फुटून स्वतंत्र झालेल्या बांगलादेशने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. आज पाकिस्तानात जो संघर्ष उभा आहे तो ऐतिहासिक आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. कारण असे संघर्ष तेथे सातत्याने उभे राहतात व जरी काही तत्कालीक राजकीय बदल झाले तरी परिस्थिती पुन्हा जैसे थेच राहते. या दुष्टचक्रातून पाकिस्तानला बाहेर काढायचे तर लष्कराचा राजकीय प्रभाव दूर करून लोकशाही प्रस्थापित करणारे कणखर नेतृत्व हवे. ही धमक सध्या तेथील एकाही राजकीय पक्षात नसल्याने मागील पानावरून पुढे सुरू हीच स्थिती यापुढेही राहणार आहे.
अनिल आजगावकर