ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या लाहौरमधील ऐतिहासिक भाई तारू सिंग यांच्या ‘शहीद स्थान’ या गुरुद्वाराला मशिदीमध्ये रूपांतररित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे. पाकच्या या प्रयत्नांचा भारताने त्यांच्या उच्चआयोगासमोर कठोर शब्दात आक्षेप नोंदवला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
श्रीवास्तव म्हणाले, लाहौरच्या नौलखा बाजार येथे भाई तारू सिंग यांचे ‘शहीद स्थान’ गुरुद्वार आहे. त्याचे मशिदीत रूपांतर करण्याचे पाकचे प्रयत्न सुरू आहेत. शहिदी स्थान एक ऐतिहासिक गुरुद्वारा असून, येथे भाई तारूजी यांनी 1745 मध्ये बलिदान दिले होते. या स्थानाला शीख समुदाय पवित्र मानतो. त्यामुळे शीख बांधवांच्या विरोधात जाऊन पाक सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत. भारताने याला विरोध दर्शवत पाकिस्तानकडे चौकशीची मागणी केली आहे.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक शीख समुदायाच्या न्यायासाठी आवाज उठत आहे. हे गुरुद्वार त्यांचा सांस्कृतिक वारसाच आहे. त्यामुळे त्यांचे धार्मिक हक्क त्यांना मिळावेत, अशी मागणी भारताने केली आहे.