लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदशी नाही देणेघेणे
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानच्या भूभागावर कब्जा करत सुटलेल्या तालिबानने अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी आपला कुठलाच संबंध नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर अन्य देशांच्या विरोधात करू देणार नसल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी आमचे कुठलेच देणेघेणे नसल्याचे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. तर पाकिस्तानी दहशतवादी आणि आयएसआयचे अधिकारी तालिबानच्या बाजूने लढत आहेत. तालिबानच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानवर आरोप
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील ‘कनेक्शन’कडे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनीच लक्ष वेधले आहे. अफगाणिस्तानवर प्रेम करत असल्यास तालिबान डूरंड रेषा मानणार नसल्याचे गनी यांनी म्हटले होते. ही सीमारेषा ब्रिटनने दोन्ही देशांदरम्यान आखली होती. या सीमारेषेला अफगाणिस्तानने कधीच मान्यता दिलेली नाही.
भारताने निष्पक्ष रहावे
शाहीन यांनी भारताच्या प्रतिनिधींची भेट घेतल्याचा दावा फेटाळला आहे. भारत अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर निष्पक्ष राहणार अशी अपेक्षा आहे. महिलांच्या अधिकारांनाही सुरक्षित ठेवले जाईल. इस्लामच्या नियमांच्या आधारावर शिक्षण आणि काम करण्याचे स्वातंत्र्य महिलांना मिळणार असल्याचे शाहीन यांनी म्हटले आहे.
भारत पुरवतोय शस्त्रास्त्रs
विदेशांकडून बसवलेल्या अफगाण सरकारची भारत बाजू घेत आहे. अफगाणांवर थोपविण्यात आलेल्या सरकारचे समर्थन करण्याचे धोरण कायम ठेवल्यास भारताला चिंता करण्याची गरज आहे. हे चुकीचे धोरण भारताचे रक्षण करू शकणार नाही. नॉर्दन अलायन्सला केलेल्या संरक्षण मदतीतून भारताला मोठा धडा मिळाला आहे. भारत अफगाण सरकारला शस्त्रास्त्रs पुरवत आहे. तालिबानशी चर्चा करू पाहणारा भारत अफगाण सरकारला शस्त्रास्त्रs, ड्रोन उपलब्ध करत असून हा विरोधाभास असल्याचे तालिबानकडून यापूर्वी म्हटले गेले होते.