ऑनलाईन टीम / मुंबई :
पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांना हुसकावून लावणार असाल तर, केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहे. राम मंदिर, कलम 370 याचा राग म्हणून मोर्चे निघत आहेत. त्यामुळे मोर्चाला उत्तर हे मोर्चाने देत पाकिस्तानी, बांग्लादेशींना हुसकावून लावण्यासाठी येत्या 9 फेब्रुवारीला आझाद मैदान येथे मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी अधिवेशनामध्ये सांगितले. दरम्यान, निवडणूकीच्या वेळेस नवीन झेंडा वापरायचा नाही. निवडणूकीसाठी वेगळा झेंडा आहे. नवीन झेंडय़ावर असलेली राजमुद्रा ही आपली प्रेरणा आहे. निवडणूकीच्यावेळेस राजमुद्रेचा वापर नको. कुठेही राजमुद्रा वेडीवाकडी टाकायची नाही. तीचा योग्य प्रकारे हाताळा, असेही ठाकरे यांनी अधिवेशनामध्ये निक्षून सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, 2006 साली पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेस माझ्या मनात हाच झेंडा होता. कुठल्याही कामासाठी सकारात्मक उर्जा असावी लागते. भगवा झेंडाच पक्षस्थापनेच्यावेळेस होता. काही केल्या भगवा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता. योगायोगाने यशाला बाप खूप असतात. अपयशाला सल्लागार खूप असतात.
मराठीला नख लावाल तर अंगावर जाईन. धर्माला हात लावण्याचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन. देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आम्ही नाकारु शकत नाही. मी मराठी आणि हिंदूसुद्धा आहे. अब्दुल कलाम, जावेद अख्तर, झहीर खान यांना आम्ही नाकारु शकत नाही. मुस्लिमांनी नमाजाचे पठण जरुर करावे, पण भोंगे नको. प्रत्येकाने धर्म आपल्या घरी ठेवावा.
भारत म्हणजे धर्मशाळा आहे का. एनआरसीचे नंतर पाहू पहिले समझौता एक्सप्रेस बंद करा. इतर देशातून आलेल्यांना कशाला पोसायचे. रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही, असेही त्यांनी सांगितले.