खटला जलद चालविण्याचा भारताचा आग्रह
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला 13 वर्षे पूर्ण होत असतानाच शुक्रवारी पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील वरि÷ राजदुताला समन्स बजावले आहे. मुंबई हल्ल्यातील 166 बळींच्या कुटुंबियांनी पाकिस्तानातील खटला पूर्ण होण्याची वाट पाहत असल्याचे सांगून, जलद खटला चालविण्याचा आग्रह भारताने पाकिस्तानकडे धरला आहे.
पाकिस्तानी राजदुतांकडे सुपूर्द केलेल्या डिप्लोमॅटिक नोटमध्ये (नोट व्हर्बल) परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला आपल्या भूभागाचा वापर भारताविरुद्ध दहशतवादासाठी होऊ न देण्याच्या वचनबद्धतेचे पालन करण्यास सांगितले. “मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटला जलदगतीने चालवण्याची आणि आपल्या ताब्यातील भूभाग दहशतवादासाठी वापरण्याची परवानगी न देण्याच्या पाकिस्तान सरकारच्या वचनबद्धतेचे पालन करण्यावर भारताने राजनैतिक नोटमध्ये भर दिला आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.
26/11 च्या हल्ल्याच्या 13 वर्षांनंतरही 166 बळींची कुटुंबे खटला पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत, हे अत्यंत दुःखद आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींना न्याय देण्यासाठी पाकिस्तान फारसे गांभीर्य दाखवत नाही. दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानमध्येच करण्यात आली होती आणि तिथूनच त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानला दुटप्पी भूमिका सोडण्याचे आणि या घृणास्पद हल्ल्यातील दोषींना शिक्षा देण्याचे आवाहन करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. हल्लेखोरांना शिक्षा ठोठावणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आणि ज्यांनी प्राण गमावले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत शक्मय ते सर्व प्रयत्न करत राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.