जबलपूर / वृत्तसंस्था :
नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधी आक्रमक भूमिका दर्शवत गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानातील छळाला कंटाळून आलेल्या सर्वांना भारताचे नागरिकत्व देईपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसवाल्यांनी या कायद्याला कितीही विरोध केला तरीही ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या प्रक्रियेपासून आम्हाला कुणीच रोखू शकत नसल्याचेही त्यांनी मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील सभेत बोलताना म्हटले आहे.
पाकिस्तानातील छळापोटी भारतात आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी शरणार्थींचे आमच्याइतकेच अधिकार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे एखाद्याचे नागरिकत्व कसे हिरावले जाईल हे दाखवून द्यावे असे आव्हान शाह यांनी यावेळी दिले आहे. गृहमंत्र्यांनी यावेळी 4 महिन्यांच्या आत राम मंदिर उभारणीचे काम सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.
शरणार्थी आमचे बंधू
काँग्रेसवाल्यांनी कितीही विरोध केला तरीही या सर्व शरणार्थींना नागरिकत्व प्रदान करूनच आम्ही शांत बसणार आहोत. आम्हा सर्वांइतकाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचा भारतावर अधिकार आहे. हे शरणार्थी भारताचे पुत्र तसेच कन्या आहेत, आमच्या बंधूभगिनी आहेत असे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
फाळणीचे पाप काँग्रेसचे
काँग्रेस पक्षानेच देशाची फाळणी धर्माच्या आधारावर केली. फाळणीच्या काळात पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतात यायचे होते, पण तत्कालीन स्थिती योग्य नसल्याने ते तिथेच राहिले. आमच्या देशाच्या सर्व नेत्यांनी भारतात याल तेव्हा सर्वांचे स्वागत केले जाईल, नागरिकत्व दिले जाईल असे आश्वासन दिले होते असा दावा भाजप अध्यक्षांनी केला आहे.
महात्मा गांधींचा दाखला
2 जुलै 1947 रोजी महात्मा गांधी यांनी पाकिस्तानातून पलायन करणे भाग पडलेल्या तसेच पाकिस्तानात राहिलेल्यांना भारतात येण्याची इच्छा असल्यास नागरिकत्व देण्यात येईल असे म्हटले होते. काँग्रेसचे नेते देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत. महात्मा गांधी यांचा शब्द राहुल गांधी मानत नाहीत. महात्मा गांधी यांना काँग्रेसने कधीच त्यागले असल्याची टीका शाह यांनी केली आहे.