नवी दिल्ली
नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचा पाठिंबा मिळत आहे. दिल्ली आणि हरियाणात राहत असलेले शरणार्थी शनिवारी भाजप कार्यालयात पोहोचले. या शरणार्थींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांचे कायद्यासंबंधी आभार मानले आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा घोषणापत्रासह आमच्या विचारशैलीत प्रारंभापासूनच सामील होता. जनतेने आम्हाला बळ दिले, आमचे खासदार निवडून आले आणि खासदारांच्या माध्यमातूनच हा कायदा निर्माण झाला आहे. पाकिस्तानी शरणार्थींना नागरिकत्व देण्याचा शब्द पाळल्याचे उद्गार नड्डा यांनी काढले आहेत. भारतात आलेल्या शरणार्थींच्या मुलांना शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नव्हता. तसेच त्यांना देशात स्वतःचे घर उभारता येत नव्हते. पण मोदींनी शरणार्थींना अधिकार मिळवून दिले आहेत. या शरणार्थींना आता आम्हा सर्वांप्रमाणे अधिकार प्राप्त झाल्याचे नड्डा यांनी सांगितले आहे.