ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा पाकिस्तान फेरविचार करणार आहे. या प्रकरणात भारत अवमान याचिका दाखल करेल या भीतीने पाक सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत कुलभूषण यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मागील वर्षी दिलेल्या आदेशानुसार पाकिस्तानच्या संसदीय समितीने यासंदर्भातील विधेयकाला मंजुरी दिली. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि जमीयत उलेमा -ए-इस्लाम या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधेयक फेटाळण्याची मागणी केली होती. मात्र, विधी व न्याय विभागाच्या स्थायी समितीने विरोधकांना न जुमानता मतदान घेऊन विधेयक मंजूर केले. आठ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने, तर पाच सदस्यांनी विरोधात मतदान केले.
हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण हे पाकिस्तानमध्ये अटकेत असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल 2017 मध्ये ही शिक्षा सुनावली आहे.