ऑनलाईन टीम / लाहोर :
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मागणी केली आहे.
जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणू पाकिस्तानातही फोफावला आहे. कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने कर्जबाजारी पाकिस्तान आता सैरभर झाला असून, त्याने जगापुढे मदतीची याचना केली आहे. तर कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची मागणी पाकने भारताकडे केली आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावरील औषध कोरोनावर परिणामकारक ठरत असल्याने अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता पाकिस्तान, मलेशिया आणि तुर्कीनेही या औषधांची मागणी भारताकडे केली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जगात या औषधाच्या उत्पादनात भारताचा 70 टक्के वाटा आहे. त्यामुळे या औषधाला जगभरातून मागणी वाढत आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत 6,383 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 111 जणांचा मृत्यू झाला आहे. 1446 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर 4826 ऍक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 46 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.