ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात कार्यरत असलेले दोन अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचं कार्यालय असून, सोमवारी दोन्ही अधिकारी अचानक गायब झाले. अधिकारी बेपत्ता होऊन दोन तास झाले आहेत तरी अजून कोणाशीही संपर्क झालेला नाही आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पाकिस्तानकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.
त्यानंतर पाकिस्तान कडून शोध सुरू करण्यात आला आहे, पण अशा प्रकारे अधिकारी गायब होणे हे पाकिस्तान कडून होणाऱ्या त्रासदायक वृत्तीचे उदाहरण आहे.
दरम्यान, या आधी 31 मे रोजी पाकिस्तानच्या भारतातील उपायुक्त कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी हेरगिरीचे कृत्य केल्याने भारत सरकारने त्यांना 24 तासात देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी 2016 मध्ये देखील पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर जून च्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्विसेस इंटेलिजन्स च्या माध्यमातून इस्लामाबादमध्ये तैनात शीर्ष भारतीय मुत्सद्दी गौरव अहलुवालिया यांना त्रास देण्यात आला होता.