भारतात दहशतवादी हल्ले करण्याची जबाबदारी
श्रीनगर / वृत्तसंस्था
खतरनाक पाकिस्तानी दहशतवादी अबु झरार याला काश्मीरात कंठस्नान घालण्यात आले आहे. पूंछ-राजौरी येथे ही चकमक घडली. भारताच्या सैनिकांनी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने ही कामगिरी पार पडली. अबु झरार याचा मृत्यू ही भारतीय सैनिकांची महत्वाची उपलब्धी असल्याचे तज्ञांचे मत आहे.
गुप्तचरांच्या महितीवरुन तो लपलेल्या स्थानी सैनिकांनी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने वेढा घातला आणि झरार याला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने गोळीबार सुरु केला. त्यामुळे सैनिकांनी प्रत्युत्तरासाठी पेलेल्या गोळीबारात तो ठार झाला. नंतर या स्थानी मोठय़ा प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली.
झरार याला भारताच्या भागात काही वर्षांपूर्वी पाकने घुसविले होते. त्याच्यावर काश्मीरमध्ये, तसेच भारतात विविध ठिकाणी दशहतवादी हल्ले घडविण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले होते. तो मोस्ट वाँटेड दहशतवादी होता. गेले काही महिने तो राजौरी आणि पूंछ भागांमध्ये सक्रिय होता. गुप्तचरांनी त्याचा ठावठिकाणा शोधल्यानंतर सैनिकांना सूचना देण्यात आली. त्यांनी या माहितीच्या आधारावर मोर्चेबांधणी करुन त्याला अखेरीस ठार केले आहे.
राजौरी पूंछ भागात गेल्या काही दिवसांमध्ये 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्यामध्ये हाजी अरीफ याचाही समावेश आहे. त्याच्यावर भारतात दहशतवादी घुसविण्याची आणि त्यांच्याशी संपर्कात राहण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकची नापाक योजना
भारतात दहशतवादाला पुन्हा चालना देण्याची योजना पाकिस्तानने आखली असून त्यानुसार प्रशिक्षित दहशतवादी भारतात घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे अनेक प्रयत्न आतापर्यंत भारतीय सेनेकडून उधळले गेले आहे. तरीही पाकिस्तान ते करीतच आहे. पाकिस्तानचा कोणताही असा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असे प्रतिपादन भारतीय सेनेच्या प्रवक्त्यांनी केले.