2021-22 चा अर्थसंकल्प आज सादर होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प आज मांडण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करतील. पण देशाचा पहिला अर्थसंकल्प कुणी मांडला होता याची माहिती जाणून घेणे अत्यंत रंजक ठरणार आहे. स्वतंत्र भारत घोषणेनंतर त्वरित पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांनी अर्थसंकल्प मांडला होता, याचमुळे तो अनेकार्थाने विशेष होता.
देशातील पहिला अर्थसंकल्प ब्रिटिश राजवटीने फेब्रुवारी 1860 मध्ये मांडल्याचे मानले जाते. हा अर्थसंकल्प इंग्रज अर्थतज्ञ जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. तर स्वातंत्र्याच्या घोषणेनंतरच्या काळात देशाचा पहिला अर्थसंकल्प लियाकत अली खान यांनी मांडला. मोहम्मद अली जिन्ना यांचे अत्यंत घनिष्ठ सहकारी मानले जाणाऱया लियाकत यांना जिन्ना यांच्या शिफारसीमुळेच अंतरिम सरकारमध्ये अर्थमंत्रालय मिळाले होते.
देशाचा पहिला अर्थसंकल्प समाजवादी विचारसरणीनुरुप असून यातून देशात समानतेच्या दिशेने पहिले पाऊल पडणार असल्याचा दावा लियाकत यांनी केला होता. पण देशातील दिग्गज उद्योजकांनी त्यांच्या अर्थसंकल्पाला विरोध दर्शविला होता. लियाकत यांनी जाणूनबुजून काही विशेष हिंदू व्यापाऱयांचे नुकसान होईल अशाप्रकारचा अर्थसंकल्प मांडल्याचे म्हटले गेले होते.
उद्योजकांच्या 1 लाखाच्या नफ्यावर 25 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात होता, या प्रस्तावाला उद्योग तसेच व्यापारजगतातून मोठा विरोध झाला होता. लियाकत हे हिंदूविरोधी अर्थसंकल्प मांडत असल्याचे घनःश्याम बिर्ला आणि जमनालाल बजाज यासारख्या दिग्गज उद्योजकांचेही मानणे होते. तत्कालीन काळात उद्योगक्षेत्रात हिंदू समुदायाचे वर्चस्व होते. एक-दोन उद्योजक वगळता सर्वच हिंदू होते. अशा स्थितीत ते स्वतःला अर्थसंकल्पाचे बळी मानू लागले होते. पण, यामुळे लियाकत यांच्या पद किंवा प्रतिष्ठेला कुठलाच धक्का पोहोचला नाही, उलट ते अंतरिम सरकारमध्ये तितकेच शक्तिशाली राहिले.
अर्थमंत्रिपदाचा लाभ उचलण्यासह स्वतःची कट्टरता हिंदू मंत्र्यांवर दाखवत असल्याचा आरोप लियाकत यांच्यावर झाला होता. बिगरमुस्लीम मंत्र्यांच्या प्रस्तावांना ते मंजुरी देत नव्हते. एकीकडे लियाकत यांना हिंदू-विरोधी म्हटले जायचे, तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थही अनेक युक्तिवाद होते. लियाकत यांची पत्नी गुल-ए-राना यांचा संबंध हिंदू परिवाराशी होता. परंतु नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यानंतर लियाकत यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.
2 फेब्रुवारी 1946 रोजी त्यांनी वादग्रस्त अर्थसंकल्प मांडला होता. फाळणीनंतर लियाकत अली खान पाकिस्तानात गेले आणि त्यांनी तेथील पंतप्रधानपद भूषविले होते. 16 ऑक्टोबर 1951 रोजी रावळपिंडी येथे त्यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती.