पोलीस महासंचालकांचे अपहरण केल्याचा सैन्यावर आरोप : जनरल बाजवा यांच्यावर हस्तक्षेप करण्याची वेळ
वृत्तसंस्था / कराची
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई कॅप्टन सफदर यांना दोन दिवसांपूर्वी कराचीत झालेल्या अटकेचे प्रकरण नवे वळण घेऊ लागले आहे. सफदर यांना सोमवारी कराचीच्या एका हॉटेलमधून दरवाजा तोडून अटक करण्यात आली होती. तेथे ते पत्नी मरियम यांच्यासोबत वास्तव्यास होते. त्यांना सैन्य आणि रेंजर्सनी अटक केली होती. या कारवाईवर सिंध प्रांतातील पोलीस अत्यंत नाराज झाले आहेत. पोलीस महासंचालकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱयांनी रजेवर जाण्याची घोषणा केली होती. वाद वाढल्याने सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी त्वरित याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले तसेच पोलीस महासंचालकांशी चर्चाही केली. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱयांनी रजेवर जाण्याचा निर्णय 10 दिवसांसाठी स्थगित केला आहे.
पोलीस महासंचालकांचे सैन्याकडून अपहरण करण्यात आले होते. त्यांना कॅप्टन सफदर यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचा आरोप नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाचे प्रवक्ते मोहम्मद जुबैर यांनी केला आहे.
प्रथम रजा, नंतर राजीनामा
सिंध पोलीस विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱयांनी रजेचा अर्ज दिला होता. यात पोलीस प्रमुखांसह तीन अतिरिक्त पोलीस महासंचालक 25 आयुक्त, 30 अतिरिक्त अधीक्षक आणि शेकडो अधीक्षक, उपअधीक्षक आणि स्थानकप्रमुखांचा समावेश आहे. सध्या आम्ही केवळ रजा मागत आहोत, जर सन्मान करण्यात आला नाही तर सामूहिक स्वरुपात राजीनामा देणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने म्हटले आहे.
सफदरप्रकरणी चूक मान्य
मरियम यांचे पती कॅप्टन सफदर यांना कराचीतून अटक करून सैन्य चांगलेच अडचणीत आले आहे. कराची शहर सिंध प्रांतात असून तेथे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार आहे. या प्रांतातील पोलीस प्रमुख मुश्ताक मेहर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱयांनी सैन्याच्या कारवाईला विरोध दर्शवत रजेवर जाण्याची घोषणा केल्यावर खळबळच उडाली आहे. स्थिती निवळावी याकरता सैन्यप्रमुख बाजवा यांना पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो यांच्याशी बोलावे लागले आहे. याप्रकरणी त्वरित चौकशी करून दोषींना शिक्षा मिळवून देणार असल्याचे आश्वासन बाजवा यांनी दिले आहे. सूत्रांनुसार बाजवा यांनी सैन्याधिकाऱयांकडून चूक झाल्याचे मान्य केले.
राजकारणात सैन्य अडकले
विरोधी पक्षांची संघटना पाकिस्तान डेमोक्रेट प्रंटने काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील गुजरांवाला आणि कराची येथे मोठी सभा घेतली आहे. विरोधकांनी प्रामुख्याने सैन्यालाच लक्ष्य करणे चालविले आहे. सैन्याच्या हस्तक्षेपामुळेच इम्रान खान सत्तेवर आल्याचा आरोप विरोधी आघाडीने केला आहे. सर्व विरोधी पक्ष इम्रान खान आणि सैन्याच्या विरोधात एकजूट होऊन आंदोलन करत आहेत. पहिल्यांदाच सैन्याच्या जनरलांचे नाव राजकीय सभांमध्ये घेतले जात आहे. आयएसआयही निशाण्यावर आहे. अशा स्थितीत इम्रान सरकार आणि सैन्य दुहेरी संकटात सापडले आहे.