66 हजारांच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई
वार्ताहर /पाचल
राजापूर तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर पाचल शाळेच्या मुख्याध्यापकांनी शालेय पोषण आहाराच्या रक्कमेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत त्यांना मुख्याध्यापक पदावरून पायउतार करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांनी दिलेल्या सूचनांनुसार झालेल्या या कारवाईने पाचल परिसरात खळबळ उडाली आहे.
सरस्वती विद्यामंदिर पाचल या शाळेतील पोषण आहार योजनेबाबत आत्माराम सुतार व सहाय्यक शिक्षक संजय पाथरे यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी राजापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱयांनी चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठ विभागाला सादर केला होता. या चौकशीत जानेवारी ते मार्च 2020 या तीन महिन्याचे इंधन, भाजीपाला व पुरक आहार मानधनाची रक्कम मुख्याध्यापकांनी बँकेतून काढली, मात्र पुरवठादारांना खरेदी केलेल्या वस्तूंची रक्कम अदा केली नसल्याचे स्पष्ट झाले होते. खरेदी करताना कोटेशन प्रक्रिया राबवलेली नाही, किर्द वहीमध्ये रक्कम खर्च केल्याची नोंद नाही, व्यापाऱयांना बिलाची रक्कम अदा न करता सुमारे 66 हजार रूपये मुख्याध्यापकांनी स्वतःकडे ठेवल्याचे चौकशीत पुढे आले होते.
मुख्याध्यापक यांनी शासनामार्फत येणाऱया पोषण आहाराचा निधी हेतूपुरस्सर स्वतःकडे ठेवल्याने त्यांचे मुख्याध्यापक पद काढून घेण्यात आले आहे. दैनंदिन व प्रशासकीय कामकाज अडून राहू नये व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी तात्पुरता पदभार सेवाजेष्ठ शिक्षक सिध्दार्थ जाधव यांच्याकडे सोपवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.