वार्ताहर / पाचल
मराठी माणूस उद्योग व्यवसायात फारसा दिसत नाही, असे म्हटले जाते. तो घाबरतो आणि धाडसही करीत नाही, असे नेहमीच बोलले जाते. मात्र, याला पण काही अपवाद आहेत. राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील एक युवा व्यवसायिक धनंजय उर्फ बाळा पाथरे यांनी एक आगळा-वेगळा हार्डवेअरचा व्यवसाय सुरू करून आजच्या युवकांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
वास्तविक पाहता अशा व्यवसायात फारसा मराठी माणूस शोधूनही सापडत नाही. याला कारण ही तसेच आहे. या व्यवसायाला प्रचंड असे भांडवल असावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस या व्यवसायात उतरण्यास धजावत नाही, तसे धाडसही करीत नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठे भांडवलदार व परप्रांतियांच्या हातात असल्याचे आपण पहातो. मात्र, कोणताही धंदा अथवा व्यवसाय जिद्दीने, चिकाटीने, प्रमाणिकपणे केल्यास यशस्वी होऊ शकतो, हे बाळा पाथरे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे कोणत्याही धंद्यात किंवा व्यवसायात कोणत्याही एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी नसते. बाळा पाथरे यांचे दहावीपर्यतचे शिक्षण पाचल हायस्कुलमध्ये झाले. त्यावेळची घरची परिस्थिती बेताचीच असल्याने पुढचे शिक्षण त्यांना घेता आले नाही. त्यांचे वडील कै. श्रीकृष्ण पाथरे यांचे तळवडे-पाचल येथे छोटे किराणा मालाचे दुकान होते. त्यामुळे व्यवसायाचा वारसा हा त्यांना घरातूनच मिळाला होता. आई-वडीलांचा आशीर्वाद व कुटूंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे त्यांनी हार्डवेअरसारख्या एका आगळयावेगळय़ा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सुमारे दहा-बारा वर्षापुर्वी अतिशय तुटपुंज्या अशा भांडवलावर सुरू केलेला हा व्यवसाय अतिशय जिद्दिने, मेहनतीने, कष्टाने नावारूपास आणला आहे. व्यवसायतील प्रमाणिकपण व विश्वासाच्या जोरावर त्यांना या व्यवसायातील चांगल्या लेंकांची चांगलीच साथ लाभली. त्यामुळे पाचल बाजारपेठेतील जाखमाता हार्डवेअर नावाचे दुकान आज ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. हार्डवेअर व्यवसायाबरोबरच सिमेंट क्षेत्रातील विविध कंपन्याचे ते अधिकृत विक्रेते आहेत. उद्योग क्षेत्रातील नामवंत सिमेंट कंपन्यांच्या राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो, व्यवसाय म्हटला की चढ-उतार आलेच. मात्र नफा तोटय़ाचे गणित नेहमीच मांडून चालत नाही. प्रत्येकाशी नाळ जोडत ग्राहक हित जपायचे असते हा उद्देश डोळय़ासमोर ठेऊन ते वाटचाल करीत आहेत. आपल्या व्यवसायाचा डोलारा सांभाळताना त्यांच्याकडे आलेल्या समाजातील गरजू व्यक्तींना ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करतात. त्यांच्याकडे ही दातृत्वाची भावना असतानाही ते नेहमीच प्रसिध्दीपासून दुर राहातात. अशाप्रकारे जिद्द, चिकाटी आणि कामातील नाविन्यता याद्वारे त्यांनी स्वकष्टाने प्राप्त केलेले यश निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. आपल्याकडे पैसे नसले तरी चालतील पण आत्मविश्वास आणि जिद्द कायम असेल तर कमी भांडवलात देखील व्यवसाय उभा करू शकतो हा व्यवसायातून मिळालेला संदेश नव्या उद्योगासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.