कोल्हापूर / प्रतिनिधी
शारदीय नवरात्र उत्सवाचा आजचा पाचवा दिवस आहे . पंचमीला करवीर निवासिनीची गजारूढ पूजा बांधण्यात आलेली आहे . पंचमीला करवीरनिवासिनी आपल्या लवाजम्यासह त्र्यंबोलीसमोर कोल्हासुररुपी कोहळा हनन करायला हत्तीवर आरुढ होऊन जाते . त्र्यंबोलीचा रुसवा काढायला म्हणून दर नवरात्रीच्या पंचमीला कोलासुराला कसे मारले याचे प्रात्यक्षिक दाखवायला आणि त्र्यंबोलीने कसे सर्वांना वाचवले याचे भक्तांना स्मरण व्हावे ,म्हणून आपल्या लवाजम्यासह हत्तीवर आरूढ होऊन करवीर निवासिनी अंबाबाई त्र्यंबोलीला भेटते आणि तिथेच कुष्मांडबलीचा सोहळा पार पडतो .आजची ही पूजा मकरंद मुनिश्वर आणि माधव मुनिश्वर यांनी बांधली.