आठवी शिष्यवृत्तीत चौथ्या स्थानावर : पाचवीचा 44 टक्के, आठवीचा 26 टक्के निकाल
प्रतिनिधी / ओरोस:
फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्गने 43.77 च्या टक्केवारीसह राज्यात दुसरा क्रमांक, तर आठवी शिष्यवृत्तीत 25.97 च्या टक्केवारीसह राज्यात चौथा क्रमांक क्रमांक मिळविला.
प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी याबाबतची माहिती दिली. पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक अर्थातच पाचवी आणि आठवी इयत्तेत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी 16 फेब्रुवारी 2020 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. दरवर्षी मे महिन्यात या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे तो 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन पद्धतीने अंतरिम स्वरुपात जाहीर करण्यात आला.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हय़ातून 4302 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. यापैकी 4263 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते. तर 39 विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांपैकी 1866 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 43.77 टक्के निकाल नोंदवला गेला.
पाचवी शिष्यवृत्तीत कोल्हापूर जिल्हा 44.87 टक्केवारीसह (प्रथम), सिंधुदुर्ग 43.77 (द्वितीय), रत्नागिरी 43.03 (तृतीय), सातारा 38.92 (चौथा), मुंबई उत्तर 36.51 (पाचवा) राहिला आहे.
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हय़ातून 2620 विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली होती. तर 2587 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. 33 विद्यार्थी गैरहजर राहिले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 672 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हय़ाचा निकाल 25.97 टक्के लागला आहे.
आठवी शिष्यवृत्तीतही कोल्हापूर 32.39 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर राहिला. मुंबई दक्षिण 28.55 (द्वितीय), मुंबई उत्तर 26.51 (तृतीय), सिंधुदुर्ग 25.97 (चौथा) तर मुंबई पश्चिम 25.24 (पाचवा).
यावर्षी पाचवीच्या निकालात सिंधुदुर्गने बाजी मारली आहे. त्या तुलनेत आठवीचा निकाल कमी झाला आहे.