मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालकांना दिल्लीत बोलावले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पश्चिम बंगाल दौऱयाच्यावेळी त्यांच्या वाहनताफ्यावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला होता, त्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालय आता पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक झाले असून त्यांनी त्या राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना 14 डिसेंबर रोजी दिल्लीत पाचारण केले आहे. मात्र, वाहनांवरील हल्ल्याच्या घटनेचा तपास सुरू असल्याची स्पष्टोक्ती देत दोन्ही अधिकाऱयांनी बैठकीसाठी दिल्लीत येण्यास नकार दर्शवला आहे. प. बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांनी यासंबंधी गृह सचिवांना पत्र लिहून आपले म्हणणे कळवले आहे.
नड्डा यांच्या वाहनताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृह विभागाने पश्चिम बंगालमध्ये पोलीस आणि मुख्य प्रशासकीय अधिकाऱयांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेतली जाणार आहे. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था स्थिती कमालीची बिघडली आहे असा अहवाल राज्यपाल जगदीप धनकर यांनी गृह मंत्रालयाकडे पाठवल्यानंतर गृह मंत्रालयाने दोन वरिष्ठ अधिकाऱयांना दिल्लीत पाचारण केले आहे.
जे. पी. नड्डा आणि अन्य भाजप नेत्यांचा वाहनताफा 24 परगणा जिल्हय़ातील डायमंड हार्बरकडे जात असताना वाटेत त्यांच्या ताफ्यावर काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या प्रकरणात राज्यपालांनी अहवाल सादर केला असला तरी राज्य सरकारचा अहवाल अजून आलेला नाही. हा भाजपच्याच लोकांनी राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी केलेला हल्ला होता असे पश्चिम बंगाल सरकारचे म्हणणे आहे. या हल्ल्यानंतर भाजप आणि तृणमूलमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.
दगडफेक प्रकरणी सात जणांना अटक
हल्ल्यासंदर्भात तीन एफआयआर नोंद झाल्या असून शुक्रवारपर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. प. बंगाल पोलिसांनी दगडफेक केल्याबद्दल स्वत:हून दोन एफआयआर नोंदवल्या आहेत. तर तिसरी एफआयआर भाजप नेते राकेश सिंग यांनी नोंदवली. शिराकोल आणि देवीपूर येथे हल्ल्याच्या या घटना घडल्या होत्या.