प्रभाग आरक्षण, पुनर्रचना प्रकरण सर्वोच्च न्यायालयात : आज जाहीर होणार निवाडा सर्वांचेच लक्ष निवाडय़ाकडे
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील पाच पालिकांची निवडणूक, वॉर्ड राखीवता व पुनर्रचना प्रकरणी गेले काही दिवस राखून ठेवण्यात आलेला निवाडा सर्वोच्च न्यायालय आज शुक्रवार दि. 12 मार्च रोजी देणार आहे. त्या निवाडय़ाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून 5 पालिकांच्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य त्या निकालावर अवलंबून आहे. सुनावणी पूर्ण करुन निवाडा राखून ठेवण्यात आला होता.
न्यायप्रविष्ट असलेल्या 5 पालिकांच्या निवडणुका जर सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्या तर त्याचा परिणाम पणजी मनपासह इतर पालिकांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची निवडही रद्द होण्याचा धोका संभवतो. जर याचिका फेटाळल्या तर सर्व पालिकांच्या निवडणुका सुरळीत पार पडतील, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
पाच पालिकांच फक्त मतदान
मडगाव, मुरगांव, केपे, सांगे व म्हापसा या पाच पालिकांचा निवडणूक विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सुनावणी पूर्ण झाली असून फक्त निवाडा जाहीर होणे बाकी आहे. तोच राखून ठेवल्यामुळे पाच पालिकांच्या उमेदवारांमध्ये सध्या चलबिचल चालू आहे. या 5 पालिकांची निवडणूक प्रक्रिया चालू असून फक्त मतदान होणे शिल्लक आहे.
पणजी मनपा व इतर सहा पालिकांचा निवडणूक विषय न्यायप्रविष्ट नाही आणि त्या पालिकांचीही निवडणूक प्रक्रिया चालू असून त्यांचेही फक्त मतदान करणे बाकी आहे. न्यायप्रविष्ट 5 पालिका निवडणुकीचे मतदान रविवार 21 मार्च रोजी तर पणजी मनपासह इतर सहा पालिकांचे मतदान शनिवार 20 मार्च रोजी होणार आहे.
उमेदवार प्रचारात मग्न
अर्ज भरणे, तो सादर करणे, छाननी, अर्ज मागे घेणे ही सर्व निवडणूक प्रक्रिया सर्व पालिका निवडणुकीसाठी पूर्ण झाली आहे. आता फक्त प्रत्यक्ष मतदानाची प्रतिक्षा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहिली जात आहे. दरम्यान, सर्व प्रमुख उमेदवारांनी आपापली प्रचार मोहीम सुरु केली असून ते मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यात मग्न झाले आहेत.