प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील सर्व सीमा उद्या मंगळवारी 1 सप्टेंबरपासून खुल्या केल्या जातील. त्यामुळे शेजारील राज्यांतून येणाऱया नागरिकांना आता गोव्यात येणे शक्य होईल, त्याचबरोबर गोव्यात गेले कित्येक दिवस अडकून पडलेल्या परराज्यांतील अनेकांना आपापल्या घरी जाणे शक्य होईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
दै. तरुण भारतशी बोलताना त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे, तिची तंतोतंत अंमलबजावणी गोव्यात केली जाणार आहे. गोवा सरकारने आतापर्यंत लॉकडाऊन तसेच महामारी नियंत्रणाच्या सर्व नियमांची कडकपणे अंमलबजावणी केलेली आहे.
गोव्यात ये-जा करणे होणार शक्य
आम्ही मुद्धामहून कुणालाच, शेजारील राज्यांतील नागरिकांना अडविलेले नाही. परंतु कोरोनाची धास्ती असल्याने आणि केंद्र सरकारने महत्वाची नियमावली घालून दिल्याने या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. आता केंद्र सरकारनेच हे बंधन काढून टाकले आहे, त्यामुळे गेले कित्येक दिवस गोव्यात अडकलेल्यांना आपापल्या गावी जाणे किंवा तेथून कामानिमित्त गोव्यात येणाऱयांना गोव्यात येणे शक्य होईल.
राज्याच्या महसूलवाढीसाठी प्रयत्न
राज्य जरी आर्थिक परिस्थितीला तोंड देत असले तरी काही प्रमाणात महसूल वाढविण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी ठरल्याचेही त्यांनी सांगितले. कंत्राटदारांची थकलेली बिले राज्य सरकार लवकरच देणार आहे. याशिवाय बिनव्याजी कर्ज घेण्याचे प्रयत्न सरकार एका अनोख्या पद्धतीने करत असून हा प्रयोग यशस्वी होईल असे ते म्हणाले. सध्या अनेक बंधनातून राज्य मार्गक्रमण करत असल्याने वित्तीय क्षेत्रात फारच चणचण भासत आहे, पण लवकरच आम्ही अशा काही योजना आखित आहोत की ज्यामुळे राज्याच्या परिस्थितीत बऱयापैकी सुधारणा होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पाच महिन्यांतर सीमा होणार खुल्या
कोरोना महामारीमुळे 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे आंतरराज्य वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. नंतर हळूहळू करत ऑगस्टमध्ये लॉकडाऊनचे बहुतांश नियम रद्द करण्यात आले. तरीही आंतरराज्य प्रवासी वाहतूक सेवा सुरु न झाल्याने गोव्यातून बाहेर जाणाऱया व अन्य राज्यांतून गोव्यात येणाऱयांना त्रास होत होता. आता या सर्व सीमा खुल्या झाल्याने आंतरराज्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
आपण तसे म्हटलेच नव्हते : मुख्यमंत्री
काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, असे जे निवेदन केले होते त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की ते जे निवेदन करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. आपण नेमके काय बोललो याची त्यांनी खातरजमा केलेली नाही. आपण म्हटले होते की गणेशोत्सवाच्या काळात लोकांनी गर्दी केल्याने व नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे कोरोनाच्या संख्येत वाढ झालेली आहे. याचा चुकीचा अर्थ काढून काँग्रेसवाल्यांनी नकारात्मक निवेदनबाजी केली आहे, ती चुकीची आहे, असे ते म्हणाले.