ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे. निवडणूक आयोगाचे प्रमुख सुशील चंद्रा हे दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. दरम्यान, देशातील कोरोना संसर्ग लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून प्रचारसभा तसेच मतदान केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध लादले जाऊ शकतात.
कोरोना संसर्ग वाढत असला तरीही पाच राज्यात विधानसभा निवडणुका घेण्यावर केंद्रीय निवडणुक आयोग ठाम आहे. गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युद्धपातळीवर तयारी सुरू होती. केंद्रीय पथक प्रत्येक राज्यात पाठवून नुकताच कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, दुपारी निवडणूक आयोगाचे प्रमुख सुशील चंद्रा कोणत्या राज्यात किती टप्प्यात निवडणुका होणार तसेच उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, अर्ज मागे घेण्याची मुदत, छाननी, निकाल याच्या तारखा आज जाहीर करणार आहेत. त्यानंतर पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. प्रत्येक राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता प्रचारासाठी काही कठोर अटी घातल्या जाण्याची शक्यता आहे.