15 फेब्रुवारीनंतर केव्हाही आचारसंहिता लागू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये तसेच पाँडिचेरी हा केंद्रशासित प्रदेश अशा पाच विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. या प्रदेशांमध्ये 15 फेब्रुवारीनंतर केव्हाही आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यासंबंधी विचार सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
निवडणूक आयोगाने आता या प्रदेशांमधील परिस्थितीची माहिती घेण्यास प्रारंभ केला असून आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा दौराही केला आहे. या पाचही प्रदेशांमध्ये येत्या एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. कोरोना उद्रेकामुळे यंदा बहुतेक राज्यांमध्ये परीक्षा पुढे गेल्या असून त्या मे आणि जूनमध्ये होणार आहेत. या परीक्षा प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ नये म्हणून निवडणुका एप्रिलमध्येच घेतल्या जातील असा संकेत देण्यात आला आहे.
सर्वसाधारणपणे निवडणूक आयोग प्रथम निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांचे दौरे करतो. नंतर तेथे निवडणूक घोषित केली जाते. मात्र गेल्या नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये निवडणूक झाली होती. तेथे मात्र निवडणूक आयोगाने प्रथम निवडणूक घोषित केली होती आणि नंतर राज्याची परिस्थिती पाहण्यासाठी दौरा केला होता.