रवींद्र चव्हाण यांचे आवाहन : सावंतवाडीत नाथ पै सभागृह नूतनीकरण शुभारंभ
वार्ताहर / सावंतवाडी:
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात भरघोस निधी दिला. त्यामुळे शहराचा विकास होऊ शकला. गतवेळच्या नगराध्यक्षांना अंतर्गत राजकारणामुळे आलेल्या पैशांचा योग्य वापर करता येऊ शकला नाही. मात्र, भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांनी योग्य समन्वयाद्वारे निधी उपयोगात आणला आहे. परब यांनी विकासकामाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. भाजपच्या हाती पाच वर्षासाठी सत्ता द्या. मग शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने बॅ. नाथ पै सभागृहाच्या वाढीव कामाचा शुभारंभ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सेवानिवृत्त सैनिक संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंत सावंत, तातोबा गवस, संजय सावंत, संजय शेडगे, रुपेश राऊळ, भाई सावंत, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, विशाल परब, राजू बेग आदी उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, सावंतवाडी शहराचा विकास संजू परब यांनी करून दाखविला. या राज्य सरकारकडे निधी देण्याची मानसिकताच नाही. या शहरात 11 कोटी रुपये अंडरग्राऊंड वीज वाहिनीसाठी आले होते. ते परत गेले. अंतर्गत वादामुळे पूर्वीच्या नगराध्यक्षांना काही करता आले नाही. भाजी मंडईसाठी 50 कोटी गरज असताना पाच कोटीच आले. विकास करण्यासाठी मानसिकता लागते. समन्वय हवा. एक वर्षात आम्ही विकास करून दाखविला. पुढील काळात शहराचे चित्र बदलेल.
केसरकरांचे कौतुक
चव्हाण यांनी आमदार दीपक केसरकरांचे कौतुक केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस निधी दिला. चांदा ते बांदा योजना आमदार दीपक केसरकर यांनी राबविली. पण या सरकारने ती बंद पाडली आहे, हे दुर्दैव आहे. केसरकर आज मुंबईत विशेष बैठक असल्याने आले नाहीत.
मुख्याधिकाऱयांना सज्जड इशारा
तेली म्हणाले, सावंतवाडी शहराचा विकास वर्षभरात दिसला नाही तर 25 वर्षात ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी काय केले? हा बाहेरचा, हा स्थानिक एवढी ओरड केली. संजू परब मडुऱयाचे असून त्यांनी शहराचा विकास करून दाखविला. पाच वर्षे भाजपकडे सत्ता द्या. मग शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. मुख्याधिकारी जयंत जावडेकर कार्यक्रमात अनुपस्थित राहिले. त्यांनी नगराध्यक्षांना पत्र दिले. त्यावर तेली म्हणाले, जिल्हय़ात आमची सत्ता आहे. न. पा., जि. प., पं. स. आमच्याकडे आहेत. दोन महिन्यात राज्यात आमची सत्ता आली तर तुमची काय अवस्था होईल, याची जाण ठेवा. तुम्ही राजकारण करू नका.
शिवपुतळय़ाची प्रतिकृती
सावंतवाडी शहरात जगन्नाथराव भोसले उद्यान येथे भव्य शिवपुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळा प्रतिकृतीचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजू परब म्हणाले, माजी सैनिकांच्या समस्या मार्गी लावण्यात येतील. शहराचा सर्वांगीण विकास आम्ही करणार आहोत. असेच प्रेम कायम ठेवा. यावेळी माजी सैनिक वसंत सावंत, तातोबा गवस यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्रावणी सावंत यांनी केले. तर आभार आनंद नेवगी यांनी मानले.