देशात कर्नाटक दुसऱया स्थानी : 60 टक्के बिबटय़ांची संख्या वाढली
प्रतिनिधी / बेंगळूर
बिबटय़ाच्या हल्ल्यात गाय, बैल, कुत्रा आदी प्राणी ठार झाल्याच्या बातम्या आम्ही नेहमीच ऐकत असतो. जंगलाच्या नाशामुळे वन्यप्राणी गावांमध्ये प्रवेश करत असल्याची बाब खरी असली तरी वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. सरकारच्या वन्यजीवी रक्षण कायद्यानुसार वन खात्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नामुळे प्राण्यांची संख्या वाढली आहे.
भारतात 2014 मध्ये बिबटय़ांची गणती झाल्यानंतर पुन्हा 2020 मध्ये गणती करण्यात आली. दरम्यान, राज्यात 60 टक्के बिबटय़ांची संख्या वाढली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 2018 नंतर भारतातील बिबटय़ांच्या संख्येच्या अहवालानुसार मध्य प्रदेशनंतर कर्नाटक दुसऱया स्थानी आहे. राज्यात 1,783 बिबटे आहेत. पश्चिम घाट प्रदेशात एकूण 3,387 बिबटे असून गोव्यामध्ये 86, कर्नाटकात 1,783 केरळमध्ये 650 आणि तामिळनाडूमध्ये 868 बिबटे आहेत.
वन्यजीवी तज्ञ संजय गुब्बी यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात सुमारे 2,500 बिबटे आहेत. लोकसंख्या वाढत असताना बिबटे-मानवी संघर्ष वाढत आहे, असे त्यांच्या अहवालातून दिसून आले आहे.
किनारपट्टय़ांच्या जिल्हय़ात बिबटय़ांच्या संख्येत वाढ होत असताना मानव, शेतकऱयांना होत असलेल्या नुकसानीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. वन खात्याने प्राण्यांना लागणाऱया फळांच्या झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांकडून बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना खात्यातर्फे 7.5 लाख रुपये मदतनिधी दिला जात आहे. तसेच आगामी दिवसांत पाळीव प्राण्यांच्या हानीबद्दल दिल्या जाणाऱया मदत रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.
इतर प्राण्यांची संख्याही वाढली
बिबटय़ांची संख्या वाढली असल्याचे आकडेवारी सांगते. कर्नाटकात पाच वर्षात बिबटय़ांच्या संख्येप्रमाणेच इतर प्राण्यांची संख्याही वाढल्याचे समजते. संपूर्ण देशातच अशीच स्थिती आहे.
– अशिष रेड्डी, डीएफओ, कुंदापूर विभाग