मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / मडगाव
कोरोना महामारीने सध्या गोव्यात आहाकार माजविला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करीत आहे. हॉस्पिटल व्यवस्थापन व टेस्टिंग ट्रेकिंग या दोन गोष्टीवर सरकारने भर दिलेला आहे. सध्या कोरोना चाचण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढविले आहे. शनिवारपासून तीन हजारच्यावर चाचण्या घेतल्या जात आहे. मंगळवारपासून पाच हजारांच्यावर चाचण्या घेतल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
कोरोनाची लक्षणे दिसतात सर्वांनी चाचणी करून घ्यावी व स्वतः विलगीकरणात रहावे, चाचणीचा अहवाल आला नाही म्हणून बाहेर फिरू नये, कोरोनाची लक्षणे असलेल्याच व्यक्ती कोरोनाचा फैलाव करतात. आरटीपीसीआरचा अहवाल येण्यास एक-दोन दिवस लागतात, म्हणून कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी विलगीकरणात रहाणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाची व स्वतःची काळजी घ्यावी लागेल.
हॉस्पिटलात भरती होण्यास विलंब लावू नका
कोरोनाची चाचणी सकारात्मक असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. प्रकृती बिघडेपर्यंत घरात थांबू नका, त्वरित हॉस्पिटलात भरती व्हावे व हाच त्यावर सर्वोत्तम उपाय आहे. गोव्यात हॉस्पिटलमध्ये चांगला उपचार केला जातो. काल शनिवारपासून खाटांची संख्या वाढविण्याचे काम सुरू झालेले आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 150 खाटांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. गोमेकॉत आणखीन 60 खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मडगावचे ईएसआय हॉस्पिटल पुन्हा एकदा कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर ज्यांच्याजवळ घरी विलगीकरणात राहण्याची व्यवस्था नाही अशा रुग्णांसाठी कोविड सेंटर केंद्रे सुरू करण्यात आलेली आहे. त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, फातोर्डा स्टेडियमचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यांना घरी विलगीकरणात राहणे शक्य नाही, त्यांनी कोविड सेंटरमध्ये जावे असे मुख्यमंत्री म्हणाले.
लसीकरणाचा लाभ घ्यावा
सध्या राज्यात लसीकरणाची मोहीम सुरू असून जास्तीत जास्त लोकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा. आतापर्यंत दोन लाख लोकांनी लस घेतलेली आहे. आज विमानतळावर दीड लाख नव्या लसी दाखल झालेल्या आहेत. 45 वर्षावरील प्रत्येकाने ही लस घ्यावी व सरकारने साडेचार लाख लोकांना लस देण्याचे टार्गेट ठेवले आहे. हे टार्गेट पूर्ण झाल्यावर सध्या जो आहाकार सुरू आहे तो कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पॅथॉलॉजी लॅबना अहवाल सादर करावा लागतो
ज्या पॅथॉलॉजी लॅबना आयसीएमआर मान्यता आहे, त्या लॅबना आपला अहवाल सरकारला सादर करावा लागतो. ज्या लॅबमध्ये अधिकृत चाचणी घेतली जाते, त्याचा अहवाल हा सरकारला सादर करावाच लागतो व त्यातूनच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मोजली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मडगावात एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये जो प्रकार घडलेला आहे तो कदाचित चुकीचा असावा, अहवाल बरोबर आलेला नसावा व त्यातूनच हा प्रकार घडला असावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘रेमडेसिविर’चा पुरेसा कोटा
‘रेमडेसिविर’चा सरकारकडे पुरेसा कोटा उपलब्ध आहे. रविवारी सकाळीच आपण आढावा घेतला असता पुरेसा कोटा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सोमवारी आणखीन 1500 रेमडेसिविर गोव्यात पोहचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्राणवायूची थोडी समस्या होती, ती सुद्धा दूर करण्यात आलेली आहे. प्राणवायूचा पुरवठा करणाऱयांना इंडस्ट्रील ऑक्सिजन बंद करून मेडिकल ऑक्सिजन सुरू करण्याचा आदेश दिल्याची माहिती देण्यात आली.
पर्यटकांची संख्या घटली
गोव्यात येणाऱया पर्यटकांच्या संख्येत घट झालेली आहे. गोवा सरकारने जरी बंदी घातलेली नसली तर इतर राज्यांनी रात्रीच्यावेळी संचारबंदी जारी करण्यात आलेली आहे. तसेच मिनी लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱया पर्यटकांची संख्या घटली आहे. गोव्यात येणाऱया लोकांची संख्या 70 टक्क्यांनी घटलेली आहे. केवळ 30 टक्के लोक आपल्या उद्योग व्यवसाय किंवा धंदय़ासाठीच गोव्यात येतात. त्यामुळे मुद्दामहून बंदी घालण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील बहुतेक सर्वच हॉटेल रिक्त झालेली आहे. गेल्या आठ दिवसापासून गोव्यात येणाऱया लोकांची संख्या घटलेली आहे. जे सध्या गोव्यात येतात ते काम-धंदय़ासाठी येतात. त्याच्यावर बंदी घातल्यास सर्व व्यवहार पुन्हा ठप्प होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.