निवेदन घेण्यासाठी प्रांतांचा विलंब; आंदोलकांची प्रांत कार्यालयात धडक
वार्ताहर/ पाटण
पर्यावरणाच्या नावाखाली तालुक्यातील जनतेवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी पाटण तालुका मानवी जीवन हक्क संघर्ष समितीच्या झेंडय़ाखाली युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय महाजनमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आल्यानंतर प्रांत निवेदन स्वीकारण्यासाठी लवकर न आल्याने आंदोलकांनी पोलीस बंदोबस्त झुगारत थेट प्रांत कार्यालयात धडक मारली. यावेळी आंदोलक व पोलिसांची झटापट झाली. यावेळी प्रशासनाच्या नावाने बेंब मारत आंदोलकांनी त्यांचा निषेध केला.
राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम , मानवी जीवन हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेश पवार, माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, तालुका दूध संघ चेअरमन सुभाषराव पवार, अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी-विक्री संघ चेअरमन ऍड. अविनाश जानुगडे आदींसह महाविकास आघाडी तसेच अन्य राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना कोणताही पक्ष, गट-तट नसतो. पर्यावरणाच्या नावाखाली कोयना अभयारण्य , सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सेटिव्ह झोन, कोअर झोन, बफर झोन, कॉन्झर्वेशन झोन आदीं प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक जनतेवर प्रचंड अन्याय व अत्याचार सुरू असताना शासन, प्रशासन आणि राज्यकर्ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. नियम आणि अटींच्या निर्बंधाखाली भरडल्या जात असलेल्या जनतेच्या न्याय व हक्कासाठी आत्तापर्यंत लोकशाही पद्धतीचा अवलंब करून न्याय, हक्काची सनदशीर मार्गाने मागणी केली. यापुढे स्थानिकांच्या या मागण्या तातडीने सोडवल्या नाहीत तर प्रशासनाकडे न्यायाची भीक न मागता उग्र आंदोलन उभारुन शासनाला सळो की पळो करून सोडण्याचा इशारा सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला.
ते म्हणाले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. त्यात बऱयापैकी यशही प्राप्त झाले. मात्र त्यानंतरही अजून काही प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांना वाचा फोडताना कोणताही पक्ष न पाहता सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. राज्यकर्ते व प्रशासनाने आमच्या भावना लक्षात घ्याव्यात. आमचा शेतकरी सर्वच बाजूंनी हैराण झाला असताना देखील वन्यजीव विभाग पंचनामे करताना सुद्धा स्थानिकांकडून आर्थिक अपेक्षा ठेवतात, ही खेदाची बाब आहे. हा भ्रष्टाचार तातडीने थांबवा नाहीतर भविष्यात आम्ही दांडके हातात घेऊन तुम्हाला वठणीवर आणू. टक्केवारीच्या स्थानिक राजकारणात विकासाचे वाटोळे झाले आहे. सत्तेच्या नावाखाली जर लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱयांनी स्थानिकांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर यापुढे तुमची गय केली जाणार नाही. वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात मानवी व शेतीच्या नुकसानीची बाजारभावाप्रमाणे तातडीने नुकसान भरपाईसह आदी मागण्यांचे निवेदन आता शासनाला दिले आहे. याबाबत पंधरा दिवसांत तातडीने कार्यवाही व्हावी अन्यथा व्यापक उग्र जनआंदोलन पुकारू, असा इशाराही पाटणकर यांनी यावेळी दिला.
राजाभाऊ शेलार म्हणाले, पाटण तालुक्यातून मानव जात नष्ट करण्याचा विडा या पर्यावरण पूरक प्रकल्पांच्या माध्यमातून उचलण्यात आल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आजपर्यंत अनेकदा या संदर्भात लढे दिले मात्र आता यापुढची लढाई याहूनही आक्रमक असेल.
विक्रमबाबा पाटणकर, सुरेश पाटील, स्नेहल जाधव, सुभाषराव पवार आदींची भाषणे झाली. उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी या निवेदनातील मागण्यांपैकी ज्या मागण्या तालुका स्तरावर सोडवण्यात येतील, त्याचा तातडीने बैठक घेऊन विचार केला जाईल. जिल्हाधिकारी स्तरावर देखील याची लवकरच बैठक घेऊन जे धोरणात्मक निर्णय आहेत, त्याबाबतच्या मागण्या शासनाकडे सुपूर्त केल्या जातील अशी ग्वाही यावेळी दिली.
मोर्चात प्रकल्पग्रस्त महिलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर होती. माजी पंचायत समितीच्या माजी सदस्या शोभा कदम, नगराध्यक्षा मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, दिनकरराव घाडगे, अशोकराव गजरे, शंकर शेडगे, गुरुदेव शेडगे, राष्ट्रवादी , राष्ट्रीय काँग्रेस , ठाकरे गट, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते, धरणग्रस्त , प्रकल्पग्रस्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.