नवारस्ता / प्रतिनिधी :
पाटण तालुक्यातील मोरगिरी विभागातील आंबेघर आणि मिरगाव येथील वस्तीवर डोंगराचे मोठे कडे कोसळल्याची घटना घडली असून, या दोन्ही घटनेत 25 जण बेपत्ता असून, हे सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान हुंबरळी येथे ही एका महिलेचा दरड कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. पाटण तालुक्यात कोसळत असणाऱ्या तुफानी पावसामुळे हे भूस्खलन झाले आहे. पावसामुळे मदत कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नेमकी किती जीवित हानी झाली आहे, हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे पाटण तालुका सुन्न झाला आहे.
आंबेघर मधील चार घरे ढिगाऱ्याखाली दबली असून, या घरांमधील 15 जण बेपत्ता आहेत. 1) रामचंद्र विठ्ठल कोळेकर, 2) मंदा रामचंद्र कोळेकर, 3) लक्ष्मण विठ्ठल कोळेकर, 4) दिनकर विठ्ठल कोळेकर, 5) लक्ष्मी ल. कोळेकर, 6) हिराबाई वि. कोळेकर, 7) मारुती व. कोळेकर, 8) लक्ष्मी व. कोळेकर, 9) विनोद व. कोळेकर अशी बेपत्ता असलेल्यांची नावे आहेत तर सहा जणांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
हुंबरळी येथील घटनेत विजया रामचंद्र देसाई (वय 60) यांचा मृत्यू झाला असून, संगीता उत्तम कांबळे आणि त्यांची दोन मुले जखमी झाले आहेत तर दिवशी बुद्रुक येथील घटनेत सचिन बापूराव पाटील (वय 42) रा मंद्रळ कोळे यांचा मृत्यू झाला असून, सीताराम पवार व दत्तात्रय सुतार (दोघेही रा.काळोली) शैलेश गणपत कदम रा.मरळी हे जखमी झाले आहेत.तर मिरगाव मधील अद्याप नावे समजू शकली नाहीत.
पाटण तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच धक्कादायक घटना असल्यामुळे या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.