प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुलांना पाठय़पुस्तके वितरीत करण्याआधीच शाळा का सुरू केल्या?, असा परखड प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी 15 सप्टेंबरपूर्वी राज्यातील सर्व सरकारी शाळांना पाठय़पुस्तके पुरविण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.
विधानसौध येथे बुधवारी पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना परिस्थितीमुळे सरकारी मुद्रणालय काही काळासाठी बंद होते. त्यामुळे पाठय़पुस्तकांची छपाई वेळेत झाली नाही. शाळा सुरू होण्यापूर्वी 50 टक्के पाठय़पुस्तकांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. त्यानुसार 50 टक्के पाठय़पुस्तके शाळांना वितरीत करण्यात आली आहेत. ठरविलेल्या वेळेत उर्वरित पुस्तके सर्व सरकारी शाळांना उपलब्ध होतील असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
आतापर्यंत 70 टक्के पुस्तकांची छपाई पूर्ण झाली आहे. पुढील आठवडाभरात छपाई झालेली सर्व पुस्तके शाळांना पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल. 15 सप्टेंबरपूर्वी सर्व शाळांना पुस्तके पोहोचविण्यात येतील. ऑनलाईन शिक्षणाच्या आवश्यकतेनुसार पाठय़पुस्तकांची रचना करून ऑनलाईनवर अपलोड करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मुलांनी ऑनलाईनवरच पाठय़पुस्तके डाऊनलोड केली आहेत. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापनांना पुस्तके डाऊनलोड करून वितरीत करण्याची सूचना देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी पुरेशा बसेस सोडण्याची सूचना
दूरवरून शाळा आणि महाविद्यालयांना येणाऱया विद्यार्थ्यांना अनुकूल व्हावे यासाठी राज्यातील सर्व भागांमध्ये पुरेशा प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याची सूचना केएसआरटीसीच्या अधिकाऱयांना देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
नववी, दहावी आणि पदवीपूर्व प्रथम आणि द्वितीय वर्षातील वर्ग 23 ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये हजर होणाऱया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागातून विद्यार्थी शाळेत वेळेत यावेत यासाठी पुरेशा प्रमाणात बसेस धावणे आवश्यक आहे. जर वेळेत बसेस मिळाल्यास शाळेमधील विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाण आणखी वाढेल, असे ते म्हणाले.