तळे म्हणून शेतजमीनीचे पाणथळ करण्याचा प्रयत्न
राजू भिकारो नाईक / पणजी
करमळीतील तळे हे मूळ तळे नसूत ती शेतजमीन असून तिलाच तळे असे नाव आहे. मात्र त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्यात येत असल्यामुळे त्याला मोठय़ा तळय़ाचे स्वरुप आले. नंतर वन खात्याने ते ताब्यात घेऊन तिथे काही विकासकामे केली, मात्र शेतकऱयांना कोणतीच नुकसान भरपाई मिळाली नाही. आता गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणाने हे तळे व त्याच्या प्रभावीत क्षेत्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने (तळे व प्रभावित क्षेत्र) अधिसूचित केलेल्या मसुदा अधिसूचनेमुळ करमळीत खळबळ माजली असून करमळीतील तळे-सावट शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला आहे.
गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणाने करमळी पंचायतीला पत्र पाठवून करमळी तळे व त्याच्या प्रभावीत क्षेत्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने (तळे व प्रभावीत क्षेत्र) मसुदा अधिसूचना राजपत्रात अधिसूचित केल्याचे कळविले आहे. त्यानंतर या पत्राची दखल घेऊन करमळी ग्रामपंचायत, शेतकरी व ग्रामस्थांची खास सभा झाली. यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. करमळीचे सरपंच उत्तम मुरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, माजी सरपंच सुनिल नाईक, राजेश नाईक, विल्सन वालदारीस, वामन पिळगावकर, चेतन कवळेकर यांच्यासह शंभराहून अधिक ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
तळे व परिसराचे फेरसर्वेक्षण करावे
या विशेष सभेत प्राधिकरणाच्या उपरोल्लेखित मसुदा अधिसूचनेला तीव्र विरोध करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. त्याचबरोब संबंधित प्राधिकरणाने करमळी ग्रामस्थ, शेतकऱयांना विश्वासात घेऊन या परिसराचे फेरसर्वेक्षण करावे अशी मागणी प्राधिकरणाला पत्र लिहून करण्यात आली आहे.
तळे म्हणजे ‘लेक’ नव्हे, ते शेतजमिनीचे नाव
संपूर्ण शेतजमिनीला तळे ग्रहीत धरण्याच्या प्राधिकरणाच्या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे. त्या शेतजमिनीत छोटेसेच तळे होते. मात्र पावसाळय़ात मानस बांधण्यात येत असल्यामुळे पाणी भरुन राहत असते. त्यामुळे संपूर्ण शेतजमीन म्हणजे तळेच वाटते. सुमारे शंभर लोकांची शेती या पाण्याखाली आहे. प्रत्यक्षात त्या शेतजमिनीचे नाव तळे आहे, असेही प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
‘शेणलेली गोरवा करमळेच्या तळय़ान’
तळे या शेतजमिनीत अनेक गावांतील गुरे चरण्यासाठी येत होती. म्हणून ‘शेणलेली गोरवा करमळेच्या तळय़ान’ अशी म्हणही अनेक वर्षांपासून प्रचलीत आहे. मात्र वन खात्याने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तळय़ाचे ‘लेक’ करुन टाकले. तरीही या प्राधिकरणाने आता पाणथळ म्हणून संवर्धन करताना ती शेतजमीन असल्याचे लक्षात घेणे आवश्यक आहे.
शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
शेतकऱयांच्या खासगी जमिनी गेली अनेक वर्षे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱयांना शेती करता आलेली नाही. वन खात्याने तळय़ाच्या भागात काहीशी सुधारणा करताना शेतकऱयांचा विचारच केलेला नाही. त्यामुळे शेतकऱयांचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई लवकरात लवकर करावी, अशी मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
परिसरातील घरांचे, भूखंडधारकांचे संरक्षण व्हावे
तळय़ाच्या परिसरात काही घरे अस्तित्वात आहेत. त्याशिवाय काही विकसीत करण्यात आलेले भूखंडही आहेत. तळय़ाच्या बाजूचा हा परिसर प्रभावित क्षेत्र म्हणून घोषित केला तर या घरांना, व भूखंडधारकांसमोर अनेक संकटे उभी राहणार आहेत. त्यामुळे या सर्वांच्या नैसर्गिक, आर्थिक अधिकारांचे संरक्षण व्हायला हवे, असेही नमूद करण्यात आले आहे.
प्रभावित क्षेत्र मर्यादा कमी करावी
बफर झोन आणि प्रभावित क्षेत्र मर्यादा कमी करण्यात यावी, अशी चौथी मागणी करण्यात आली आहे. तसेच तळय़ाच्या परिसराचे फेरसर्वेक्षण करावे अशी पाचवी मागणी करण्यात आली आहे.
मसुदा अधिसूचनेमुळे करमळीत खळबळ
तळे-सावट शेतकरी संघटनेने या प्राधिकरणासह स्थानिक पंचायत, आमदार पांडुरंग मडकईकर यांनाही निवेदन सादर केले असून लवकरच कृषीमंत्र्यांनाही निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या या अधिसूचनेमुळे करमळी गावात शेतकरी व ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे.
तळे-सावट शेतजमिनीसाठी समितीची निवड
तळे-सावट शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी वामन पिळगावकर यांच्या नेतृत्वाखाली समिती निवडण्यात आली आहे. त्यात जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, आनंद भोमकर, जना सूर्या नाईक, चेतन पी. कवळेकर, महाबळेश्वर कवळेकर, सुभाष कवळेकर, ऍड. विश्वास काणकोणकर, सदानंद तिवरेकर, विष्णू मार्शेलकर, तुकाराम अडकोणकर, ताणू भोमकर, आत्मा गावडे, चंद्रशेखर गावडे, गुणो फर्नाडिस, दशरथ करमळकर, अनंत कुंडईकर, यादू आर. कुंडईकर, रामचंद्र आर. कुंडईकर, तुळशीदास रोहिदास पेरेरा, कृष्णनाथ गांगू मडकईकर, सुरज कुट्टीकर, तुळशीदास (काली) बट्टल भोमकर यांचा समावेश आहे.
करमळी पाणथळ समितीची निवड
डॉ. विनोद वेरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाणथळ समिती निवडण्यात आली असून त्यात राजेंद्र एस. सिद्धरकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, ऍड. विश्वास काणकोणकर, देवानंद गोवेकर, थाणू काणकोणकर, वामन पिळगावकर, विष्णू मार्शेलकर, उत्तम मुरगावकर, राजेश नाईक, शांताराम करमळकर, चेतन कवळेकर, महाबळेश्वर कवळेकर, सुरज कुर्टीकर, सुभाष कवळेकर, तुळशीदास रोहिदास परेरा, विठू मार्शेलकर, तुळशीदा (काली) बट्टल भोमकर, रामचंद्र कुंडईकर, अनंत कुंडईकर यांचा समावेश आहे.